दीर्घायुष्याचे त्यांच्या कारण.. अविरत कष्ट, निर्व्यसन, योगा अन् नामस्मरण
तेजस देसाई / दोडामार्ग:
निरोगी जीवन प्रत्येकाला हवे आहे. पण, त्याची नीतीमूल्ये जपायला हवीतच ना? प्रचंड कष्ट, निर्व्यसन, योगा व नामस्मरण या चतुसूत्रीने सुदृढ व निरोगी दीर्घायुष्य जगता येते, हे दाखवून दिले आहे. तिलारी धरणग्रस्त मूळ सरगवे व आता कसई (केळीचे टेंब) येथे राहाणाऱया संभाजीराव उर्फ दत्ताजीराव देसाई यांनी. त्यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभरी पार केली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांना अद्यापपर्यंत वैद्यकीय उपचार माहीत नाहीत. शिवाय आजही त्यांची तब्येत ठणठणीत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता जन्मतारखेचा पुरावा म्हणून त्यांनी जन्मपत्रिका सादर केली. त्यात 31 मे 1920 अशी जन्मतारीख आहे.
देसाई यांच्याशी संवाद साधताना समोर आलेली माहिती अशी की, आजच्या धकाधकीच्या जीवनात (काळात) शंभर वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत तिलारी नदी किनारी वसलेल्या सरगवे गाव, जो गाव तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडीत गेला. त्यामुळे सरगवे गावात मोठय़ा कष्टाने केलेली फळबायायती सोने पिकवणारी शेती उत्पन्न मिळण्याच्यावेळी धरणाच्या पाण्यात गेली. पण, त्यांनी पुन्हा हे विश्व निर्माण केले. या गोष्टींचा सल ते कधीतरी बोलून दाखवतात. पण, आले ‘भगवंतांच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ या म्हणीवर नितांत विश्वास असल्याने त्यांनी पाण्यात गेलेल्या मिळकतीचे दुःख मानले नाही.
अपार कष्टाचे फळ
याच गावातील कष्टकरी शेतकरी देसाई कुटुंबियाचे आधारवड असलेले संभाजीराव उर्फ दत्ताजीराव बाबासाहेब देसाई यांनी 31 मे ला शंभरी पार केली. आजच्या धकाधकीच्या जीवनात नामस्मरणाचे महत्त्व सामाजिक माध्यमांवर किंवा इतर माध्यमांद्वारे शिकवणारे अनेक गुरू मिळतात. परंतु देसाई कुटुंबाला देसाई यांनी नामस्मरणामुळे निरोगी आयुष्य कसे मिळू शकते, हे प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. ही शंभरी पार करत असताना आजही ते धडधाकट आहेत. आजही त्यांच्यावर गोळय़ा औषधे घेण्याची वेळ आली नाही, हे विशेष. ही त्यांची देवभक्ती केलेल्या नामस्मरणाचा व केलेल्या अपार कष्टाचे फळ आहे.
कुटुंबाला प्रेरणा
सरगवे गावात असताना हाडाचा शेतकरी कसा असतो, हे दाखवून दिले. तिलारी धरणाच्या पाण्यात सरगवे गाव बुडीत गेला. गावचे स्थलांतर केले पुनर्वसन झाले. पण, कष्टाच्या बाबतीत कुठलाही समझोता केला नाही. हाडाचा शेतकरी, हाडाचा साधक, वाचक या शब्दात त्यांचे वर्णन करणे योग्य ठरेल.
पहाटे योगा, मंत्रोच्चार
देसाई यांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार, उच्च शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे केले. वयाचा विचार करून आजोबांनी शेतीची कामे शिकारीचा छंद सोडून दिला. परंतु नामस्मरण, वाचन हा छंद यात वर्षांचे 365 दिवस कधी खंड पडू दिला नाही. पहाटे उठून योगासने करणे, नित्यनेमाने देवपूजा करणे आपल्या दमदार आवाजात मंत्रोच्चार करणे यात खंड पडू दिला नाही. आजोबांची देवपूजा व त्यांचे आशीर्वाद यामुळे देसाई कुटुंबीय यांची आत्ताची पिढीही सख्या भावडांपेक्षाही जवळ व एकत्र आहे.
प्रत्येकाला आई-वडील यांचा तसेच पतीला पत्नीचा आधार असतो. पण, आजोबांच्या अर्धांगिनी प्रेमाबाई देसाई यांचे 1991 साली अपघाती जाणे हे सहन करण्यापलीकडे होते. एवढी वर्षे साथ दिलेली पत्नी सोडून गेली होती. अशा कठीण प्रसंगात आयुष्यात आलेल्या संकटाचा सामना जिद्दीने केला व वेदना हसतमुखाने सहन केल्या.
अखंडित योगधारणा
देसाई सांगतात, त्यावेळी म्हणजे साधारण पन्नास वर्षांपूर्वी गावात एक साधू आला होता. त्याने योगासने दाखवली. ती आपण नियमित करतो. आज बाकी आसन जमत नसली, तरी ध्यानासनात खंड पडू दिला नाही.
कष्ट करा…तंदुरुस्त रहा
देसाई आजोबांना कोणतेही व्यसन नाही. त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन शेती केली. ते म्हणतात, कष्ट केली की झोप चांगली येते. ते दुपारी कधीही झोपत नाहीत. लवकर निजे, लवकर उठे, त्याला आरोग्य भेटे. याप्रमाणे ते रात्री लवकर झोपतात व पहाटे साडेचार वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो. त्यांचा आहार संमिश्र शाकाहारी, मांसाहारी असा आहे. नव्या पिढीने, प्रामाणिक कष्ट व नामस्मरणावर भर द्यायला हवा, असे ते आवर्जून सांगतात.