उपनगरांमध्ये लग्न समारंभात ‘डीजे’ चा दणदणाट
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळीनंतर लग्न सराईची धामधूम सुरू झाली आहे. एकीकडे कोरोनानंतर प्रशासनाने या समारंभांवर अनेक निर्बंध घातले असताना दुसरीकडे मात्र उपनगरांमध्ये हळदी-लग्न समारंभात डॉल्बीचा दणदणाट सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत डॉल्बी सुरू असल्यामुळे परिसरातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण असावे व वेळेची मर्यादा पाळावी, अशी मागणी सुशिक्षित नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लग्न समारंभात उत्साह व जल्लोषाला काहीच कमी नसते. लग्न एकदाच होते, त्यामुळे ते धूमधडाक्मयातच झाले पाहिजे, असा विचार प्रत्येकाचाच असतो. परंतु या धूमधडाक्मयात आपण इतरांना त्रास देतोय याचाही विचार करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे प्रशासनाने बँडवरही निर्बंध लादले होते. परंतु सध्या ते काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. तर एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी 200 नागरिकांनाच लग्न समारंभासाठी परवानगी दिली जात आहे.
बेळगाव शहराच्या उपनगरांमध्ये मात्र रात्रीही डॉल्बीचा दणदणाट सुरू आहे. हळदी समारंभात रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत डॉल्बीच्या तालावर धांगडधिंगा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वृद्ध, आजारी व लहान मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.