दलित संघर्ष समितीच्यावतीने पुन्हा जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
रायचूर येथील जिल्हा न्यायाधीशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान केला आहे. तेंव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दलित संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रायचूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये हा प्रकार घडला आहे. प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करताना रायचूरचे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी तेथे असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटविण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानच आहे. तेंव्हा त्या न्यायाधीशांवर कारवाई ही झालीच पाहिजे.
ध्वजारोहण करताना तेथे डॉ. आंबेडकर यांची असलेली प्रतिमा हटविल्यानंतरच आपण ध्वजारोहण करू, असे सांगितले. ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांचाच अशाप्रकारे देशामध्ये अवमान होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. जी घटना घडली आहे ती एका न्यायाधीशांकडून घडली आहे. त्यामुळे हा मोठा अवमान आहे. याचा कोठे तरी विचार होणे गरजेचे आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गुरुप्रसाद करगेंड, गुंडू तळवार, विजय मादार, शशिकांत हुल्लोळी, अशोक कोलकार, मोहन बुरुड, गंगाराम कांबळे, सुभाष हेगडे, प्रभाकर कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.