सातारा/प्रतिनिधी
भारतीय साहित्य समीक्षक व ख्यातनाम भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. उंडाळे येथे १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ३७ व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशनात डॉ. गणेश देवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी दिली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. देवी यांना नवी दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक व शेतकरी नेते योगेंद्र यादव यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे सांगून उंडाळकर म्हणाले, १९७६ पासून उंडाळे येथे दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन भरवले जाते. या अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील नामवंत विचारवंत, साहित्यिक यासह मान्यवरांनी याठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त केले आहेत.
यापूर्वी स्वातंत्र्य सेनानी एन. जी. गोरे, श्रीमती उषा मेहता, गोविंदभाई श्रॉफ, निर्मलाताई देशपांडे, जी. पी. प्रधान, प्रभाकररावजी कुंटे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर, अण्णा हजारे, शांताराम गरुड, निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत, कृषी तज्ञ डॉक्टर जयंत पाटील, डॉक्टर अभय बंग, डॉक्टर प्रकाश आमटे, निळकंठ रथ, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, प्रसिद्ध वकील उज्वल निकम यासह विभूतीना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. गणेश नारायणदास देवी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर येथे झाला असून, ते बडोदा येथील भाषा संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. भारतातील बोलीभाषा व नष्ट होत चाललेल्या ७८० भाषांवर त्यांनी संशोधन करून त्या भाषांना मान्यता प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर साहित्य अकादमीचा ही देश पातळीवरील मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत, सांस्कृतिक नेत्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.