प्रतिनिधी / सांगली
सांगलीवाडी येथील डॉ पतंगराव कदम महाविद्यालय येथे गुरुवारी चौथ्या ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापिठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, अधिष्ठाता शहाजी देशमुख, ज्येष्ठ समिक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी सावंत उपस्थित होते.
साहित्य संमेलनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते ई-वाचनकट्टा या उपक्रमाचा शुभारंभ झाला. महाराष्ट्रातील फक्त दोनच जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये असे मराठी साहित्य संमेलन भरते. एक म्हणजे सांगोला व दुसरे सांगली. या दोन्ही जिल्ह्यात असे साहित्य संमेलन भरत असल्याने मान्यवरांनी त्याचे विशेष कौतुक केले.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. आभार श्रीकृष्ण मोहिते यांनी मानले. प्रा. प्रभा पाटील व प्रा. सूर्यकांत बुरुंग यांनी सुत्रसंचालन केले.
यावेळी शामराव अण्णा पाटील, साहित्यिक बि. बा. पाटील, जयवंत आवटी, दीपक स्वामी, प्रतिभा जगदाळे, प्रा. संजय ठिगळे, आर. आर. सावंत, डॉ. संतोष माने आदींची उपस्थिती होती.