प्रतिनिधी / सांगली
भारती विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात एक वेगळी क्रांती घडवून आणली. भारती विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ.पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या बळावर महाविद्यालयाने जी प्रगती केली आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. असे मत शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य व डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले. डॉ. पतंगराव कदम यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे संस्थापक–कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कणसे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आल स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा संजय ठिगळे यांनी केले. स्वागतपर भाषणात ठिगळे म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कार्याचा आदर्श तरुणाईने घ्यावा.
डॉ. कदम यांनी शिक्षण, सहकार,राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे आहे. असे मत कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य कणसे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील, प्रा. टी. आर. सावंत, महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.