शनिवारी राज्यपालांकडे सादर केला राजीनामा
प्रतिनिधी/ पणजी
डॉ. प्रमोद सावंत हे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री बनले असून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत ते या पदावर राहणार आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तो त्वरित मंजूर केला आणि नंतर त्यांच्याकडेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सुपूर्द केला.
घटनेतील तरतुदीनुसार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्र्यांना पदाचा राजीनामा सादर करावा लागतो. त्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री नियुक्त करण्यात येतो.
त्यानुसार डॉ. सावंत यांनी शनिवारी राजभवनवर राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा सादर केला. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर राज्यपालांनी त्यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले. त्यासंबंधीचे पत्र त्यांना सुपूर्द केले.
त्यावेळी बोलताना श्री. पिल्लई यांनी डॉ. सावंत यांच्या मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याची स्तुती केली. गत आठ महिन्यांच्या गोव्यातील कार्यकाळात त्यांनी आपणास सर्व प्रकारचे सहकार्य केले, त्याबद्दल आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, डॉ. सावंत यांनी आपण पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केल्याचे सांगितले. तसेच नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आपणाकडे दिली असल्याचेही ते म्हणाले.
विधिमंडळ पक्षाची लवकरच बैठक
दरम्यान, दि. 14 फेब्रुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी तेच दावा करणार आहेत. मात्र ती तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. लवकरच पक्षाचे केंद्रीय संसदीय समितीचे निरीक्षक गोव्यात दाखल होणार असून त्यांच्याच उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन तारीख निश्चित करण्यात येईल. तसेच राज्य विधिमंडळ नेत्याचीही निवड करण्यात येई&ल. सदर नेता राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करेल. मात्र केंद्रीय निरीक्षक कधी येतील हे अद्याप नक्की झालेले नाही. तरीही भाजपला बहुमत मिळालेल्या चारही राज्यात एकाच दिवशी शपथविधी होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
दि. 10 रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱया दिवशी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात प्रामुख्याने भाजपला मतदान करून पाठिंबा दिल्याबद्दल तमाम गोमंतकीयांचे आभार मानण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचेही ठरविण्यात आले होते.
दरम्यान, सातव्या विधानसभेचा कार्यकाळ 16 मार्च रोजी संपुष्टात येत असून दि. 14 मार्च रोजी ही विधानसभा विसर्जित करण्यात येईल. त्यासंबंधी त्याच दिवशी राज्यपालांना पत्र सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. 16 मार्चपूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येण्याची आवश्यकता आहे.