आनंदवनमधील घटनेने महाराष्ट्रभर खळबळ
प्रतिनिधी/ चंद्रपूर, पुणे
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. त्या 39 वर्षांच्या होत्या. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून जीवनयात्रा संपविल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. काही दिवसांपासून आमटे कुटुंबीयांमध्ये सुरू असलेले वाद, आनंदवनमधील कलह, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी केलेले आरोप, त्या मानसिक ताणात असल्याचे कुटुंबीयांनी दिलेले निवेदन या पार्श्वभूमीवर त्यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
डॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत. 2003 मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. त्या अपंगत्व विशेषज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यांच्याकडे महारोगी सेवा समितीच्या संचालक मंडळाच्या सदस्य सीईओपदाची कमानही सोपविण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमटे कुटुंबीयांमध्ये अंतर्गत वाद उफाळले होते. तसेच डॉ. शीतल या मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत होते. त्यातच त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. वरोरा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना मृत घोषित केले.
पेटिंगवर ‘वॉर अँड पिस’ची कॅप्शन
डॉ. शीतल यांच्याकडून काही तासांपूर्वी एक कॅनव्हास पेंटिग ट्विट करण्यात आले होते. याला ‘वॉर अँड पिस,’ अशी अत्यंत बोलकी कॅप्शन देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः रेखाटलेल्या या पेंटिंगवर त्यांचे नाव आणि तारखेचा उल्लेख असल्याचेही दिसत आहे. तसेच अलीकडच्या काळात त्यांनी काही ठिकाणी महिलांच्या विषयावर लेखनही केले होते.
फेसबुक लाईव्हमधून विश्वस्त, कार्यकर्त्यांसंदर्भात गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून त्यांनी आनंदवनमधील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्त आणि कार्यकर्त्यांसंदर्भात गंभीर आरोप केले होते. त्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर अनेक चर्चांना ऊत आला होता. तसेच दोन तासातच हे फेसबुक लाईव्ह डिलीट करण्यात आले. त्यानंतर आमटे कुटुंबीयांकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डॉ. शीतल यांच्याकडून झालेले सर्व आरोप फेटाळण्यात आले होते.
डॉ. शीतल मानसिक तणावात : आमटे कुटुंबीयांनी केले होते निवेदन
डॉ. शीतल यांनी केलेल्या आरोपानंतर महारोगी सेवा समितीमार्फत डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षरीनिशी 22 नोव्हेंबर रोजी हे निवेदन प्रसिद्ध केले. यात ‘आमचे संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी तीन पिढय़ांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे यांनीही आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुली देत महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त व कार्यकर्त्यांबद्दल अनुचित वक्तव्ये केली आहेत. त्यातील सर्व भाष्य तथ्यहीन आहेत. त्यांच्या निवेदनामुळे कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे. तसेच संस्थेचे काम मागील सात दशकांच्या परंपरेला साजेसे यापुढेही करीतच राहू,’ असे स्पष्ट करण्यात आले होते.
कुटुंबातील वादावर चर्चा
डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे आणि कुटुंबीयांमध्ये काहीतरी वाद सुरू असल्याचे काही घटनांमधून समोर आल्याने त्याबाबत सामाजिक वर्तुळात चर्चा होती. मात्र, देश परदेशामध्ये ख्याती असलेले आनंदमय आनंदवन या घटनेने आज वेगळय़ाच कारणांसाठी चर्चेत आले आहे.
अंतर्गत वादामुळे खांदेपालट?
समाजसेवक बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी 1949 मध्ये आनंदवन या कुष्ठरोग्यांना आधार देण्यासाठी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. बाबांच्या निधनानंतर या संस्थेचा कारभार त्यांचे पुत्र विकास आमटे यांच्याकडे आला. त्यांनी काही काळ संस्थेची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांच्या मुलाची महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आली. मात्र, आमटे कुटुंबातील वादामुळे मुलाकडून हा कार्यभार काढून घेण्यात आला. त्यानंतर मुलगी शीतल यांच्याकडे जबाबदारी आली.
कार्यकर्त्यांच्या छळाचीही तक्रार
बाबा आमटे यांच्या काळात कुष्ठरोग्यांमार्फत अनेक उत्पादने तयार होत व त्याची चांगली विक्रीही होते. कुष्ठरोग्यांच्या हातून वस्तू तयार करण्याबाबत बाबा आग्रही असत. मात्र, अलीकडच्या काळात या प्रकल्पाला ग्रहण लागले. त्यात या गोष्टींना कार्पोरेट स्वरुप दिल्याचा आरोप नव्या शिलेदारांवर करण्यात येत होता. याबाबत काही कार्यकर्त्यांनी मध्यंतरी पोलिसांतही तक्रार दिली होती. तर कार्यकर्त्यांचा छळ होत असल्याची तक्रार बाबा आमटेंच्या सहकाऱयाच्या मुलाने केली होती. मात्र, डॉ. शीतल आमटे यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.
पालकमंत्र्यांनीही घेतली होती वादाची दखल
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही आनंदवनमधील वादाची दखल घेतली होती. येथील वाद, तक्रारी गंभीर स्वरुपाच्या आहेत. त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने आणू नये. आमटे कुटुंबीयांनी या वादावर तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले होते. दुसरीकडे अनेक महनीय व्यक्ती, कलाकार यांनीही येथील वाद मिटविण्याकरिता प्रयत्न केले. मात्र, त्यातच डॉ. शीतल यांच्या आत्महत्येने या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे.