निष्णात सर्जन : उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रगतीस पुन्हा अडथळा?
स्वप्नील वरवडेकर / कणकवली:
दोन वर्षांपूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालय म्हणजे समस्यांचा बाजार, रुग्णांना पुढच्या रुग्णालयात ‘रेफर’ करणारे जणू ‘सेंटर’ बनले होते. ना डॉक्टर, ना आवश्यक आरोग्य यंत्रणा. त्यामुळे रुग्णांनीही रुग्णालयाकडे पाठ फिरविलेली. मात्र, प्रख्यात सर्जन असलेले डॉ. सहदेव पाटील येथे रुजू झाले अन् रुग्णालयाला नवसंजीवनी प्राप्त होऊ लागली. पण, गेल्या दोन वर्षांत शेकडोंना जीवदान देणाऱया या अवलियाची नियतीकडून अशी क्रूर थट्टा होईल, ‘ब्रेन हॅमरेज’चे आकस्मिक कारण घडून त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागेल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते.
जवळपास चार वर्षे वैद्यकीय अधीक्षकपद रिक्त असलेल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णसेवेचे जणू तीनतेरा वाजले होते. त्याचा परिणाम म्हणजे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. साहजिकच त्यांना आर्थिक भुर्दंड पडत होता. याकडे ना राजकारण्यांचे लक्ष होते, ना प्रशासनाचे. याच स्थितीत दोन वर्षांपूर्वी डॉ. पाटील रुजू झाले अन् त्यानंतर सुरू झाला परिवर्तनाचा प्रवास…!
रुग्णालयास नवसंजीवनी
डॉ. पाटील रुजू झाले अन् रुग्णालयाने कात टाकण्यास सुरुवात केली. डायलेसीस सेंटरचे काम मार्गी लागले, याचा आजतागायत हजारभर रुग्णांनी लाभ घेतला. सोनोग्राफी विभाग सुरू होतानाच ट्रॉमा केअरच्या कामास गती मिळाली. हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱया मशिनरी दाखल झाल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनाही येथे सुरू झाली. रुग्णालयात डॉक्टरांची संख्याही वाढली. मुख्य म्हणजे अनेक स्पेशालिस्ट डॉक्टर हे पाटील यांच्या विनंतीस मान देऊन कणकवलीत खास सेवा देण्यासाठीही येऊ लागले होते. परिणामी रुग्णसंख्याही वाढू लागली.
शेकडोंहून अधिक शस्त्रक्रिया
डॉ. पाटील हे स्वत: निष्णात सर्जन होते. त्यांच्या आगमनानंतर कित्येक वर्षे धूळ खात असलेले रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर पुन्हा एकदा गजबजले होते. गेल्या दोन वर्षांत त्यांनी हजारभर शस्त्रक्रिया केल्या. यात कित्येक शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या होत्या. काही शस्त्रक्रिया तर नामांकीत वैद्यकीय महाविद्यालयांमध्येच होऊ शकतात, अशा प्रकारातील होत्या. शेकडो रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे.
रुग्णालय प्रगतीपथावर असतानाच…
एकीकडे अँजिओप्लास्टी झालेली होती, डायबेटीस, ब्लडप्रेशर असे आजार असतानाही ते दिवसाला दहा-बारा तास कार्यरत असायचे. कोरोना काळात तर रुग्णालय, कोविड सेंटर, स्वॅब सेंटर अशा तिन्ही जबाबदाऱया त्यांनी यशस्वीरित्या पेलल्या. त्यांच्याच मेहनतीने उपजिल्हा रुग्णालयाने लक्ष्य योजनेंतर्गत राज्यात दुसऱया क्रमांकावर झेप घेतली होती. त्यांच्या जाण्याने रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. पाटील यांच्या निधनानंतर त्यांनी सुरू केलेली उपजिल्हा रुग्णालयाची प्रगती थांबू नये, याची दक्षता वैद्यकीय विभागाने घेणे गरजेचे आहे.
देवमाणूस हिरावला!
देवाने साक्षात देवमाणूस आमच्यापासून हिरावून नेला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक होण्यापूर्वी काही काळ मी कणकवली रुग्णालयात ‘डेप्युटेशन’वर असताना डॉ. पाटील यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. म्हणूनच सांगू शकतो की, माणसाचे मोल त्याच्या जाण्यानंतर समजते. अगदी कठिणातील कठिण शस्त्रक्रिया करतानाही ते कचरत नसत. कणकवली रुग्णालय अधिकाधिक सक्षम व्हावे, यासाठी त्यांचे सदोदित प्रयत्न असायचे. विविध बाबींची पूर्तता होण्यासाठी ते सातत्याने माझ्या मागे लागायचे. वेळप्रसंगी स्वखर्चाने त्यांनी रुग्णालयात सुधारणा करून घेतल्या. त्यांच्या रुपाने मी चांगला मित्रही गमावला आहे.
निष्णात सर्जन गमावला!
डॉ. पाटील यांच्या जाण्याने एक निष्णात सर्जन आम्ही गमावला आहे. पाटील कणकवलीत आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे रुपच पालटू लागले होते. सर्व सहकाऱयांशीही त्यांचे नेहमीच जिव्हाळय़ाचे संबंध असायचे. रुग्णालयाच्या प्रगतीसाठी ते सदैव मेहनत घ्यायचे. त्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी स्वत:च्या खिशातील पैसाही खर्च केल्याचे आम्ही बघितले. असा सहकारी पुन्हा मिळणे नाही.