ऑनलाईन टीम / बीजिंग :
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे लष्करी तज्ज्ञ हुआंग गुओझी यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. डोंगराळ भागात लढाई करण्यासाठी भारताकडे सगळ्यात अनुभवी आणि शक्तिशाली सैन्य आहे, असे गुओझी यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, पर्वती लढाईच्या बाबतीत केवळ चीनच नाही तर रशिया आणि अमेरिका सैन्या पेक्षा ही भारतीय लष्कर अधिक कार्यक्षम आणि सामर्थ्यवान आहे. हुआंग गुओझी हे एका चिनी मासिकाचे संपादक आहेत. त्यांनी नुकतीच प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात म्हटले आहे की, सध्याच्या काळात पर्वती आणि डोंगराळ भागातील लढाईसाठी संपूर्ण जगभरात भारतकडे अनुभवी आणि सर्वात मोठे सैन्य आहे.
पुढे ते म्हणतात की, 12 डिव्हीजनमध्ये दोन लाखांहून अधिक सैनिक असलेले भारतीय दल हे पर्वतीय भागात लढाई करू शकणारे जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. तसेच भारतीय सैन्याने 1970 सालापासून पर्वतीय भागातील सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे आणि त्यांची योजना 50 हजार पेक्षा अधिक सैनिकांची तुकडी बनवण्याची आहे.
सियाचीनचा संदर्भ देत हुआंग गुओझी म्हणाले, भारतीय सेनेने सियाचीन ग्लेशिअर क्षेत्रात 5 हजार मीटर पेक्षा जास्त उंचीवर शंभराहून अधिक चौक्या स्थापन केल्या असून तेथे सहा ते सात हजार सैनिक तैनात आहेत. सर्वात उंच चौकी 6,749 मीटर उंचीवर आहेत.