वृत्तसंस्था/ बीजिंग
भूतानसोबत पूर्व भागात सीमा वाद असल्याचे चीनने अधिकृतपणे पहिल्यांदाच मान्य केले आहे. चीनची ही कबुली भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भूतानची पूर्व सीमा अरुणाचल प्रदेशला लागून असून याच भागात आता सीमा वाद असल्याचा दावा चीन करत आहे. भूतानसोबतचा सीमा वाद कधीच निकालात निघाला नसल्याचे चीनने म्हटले आहे. भूतानसोबत दीर्घकाळापासून पूर्व, मध्य आणि पश्चिम भागात सीमा वाद आहे. चीन-भूतान सीमा वादात त्रयस्थ देशाने पडू नये असे चीनने अप्रत्यक्षपणे भारताला सुनावले आहे. चीन आणि भूतानने 1984 ते 2016 पर्यंत 24 वेळा चर्चा केली आहे. या चर्चेत केवळ पश्चिम आणि मध्य भागाच्या वादाचा मुद्दा सामील होता. चीन आणि भूतानदरम्यान पूर्व भागाच्या सीमा वादासंबंधी कधीच चर्चा झाली नव्हती. दोन्ही देशांनी मध्य आणि पश्चिम भागात सीमा वाद असल्याचे मान्य केले होते. सीमा वाद सोडविण्यासाठी एका पॅकेजवर सहमती झाली होती. पूर्व भागासंबंधी चीनचा दावा पूर्णपणे नवा आहे. दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी झालेल्या दस्तऐवजांमध्यश केवळ पश्चिम आणि मध्य हिस्स्यातील वादाचा उल्लेख आहे. चीनच्या नव्या दाव्यावर भारताने अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
अभयारण्याला ठरविले वादग्रस्त
चिनी ड्रगनने भूतानच्या एका भूभागावर दावा केला होता. चीनने ग्लोबल इन्व्हॉयरन्मेंट फॅसिलिटी कौन्सिलच्या 58 व्या बैठकीत भूतानच्या सकतेंग अभयारण्याच्या भूभागाला ‘वादग्रस्त’ संबोधिले आहे. तसेच या प्रकल्पाला होणारा निधीपुरवठा रोखण्याचा जोरदार प्रयत्नही केला होता. पण भूतानने चीनचा दावा फेटाळून लावत अभयारण्याचा भूभाग स्वतःचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले आहे.