ऑनलाईन टीम / मुंबई :
ड्रग्ज अंमलीपदार्थ घेणारे म्हणून नार्को विभागाने कारवाई केलेल्या कलाकारांना निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात घेऊ नये; अन्यथा त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल तसेच अशा चित्रपटांना प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी दिला.
ते म्हणाले, हिंदी चित्रपटातील कलाकार हे सर्वसामान्यांचे आदर्श असतात. त्यामुळे जे कलाकार ड्रग्ज घेतात अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपटात घेऊ नये. तसेच, एनसीबीद्वारे ड्रग्ज अंमली पदार्थ वापरल्याच्या संशयावरून फक्त महिला कलाकारांची चौकशी केली जात असल्याचा संदेश जात आहे. यात अभिनेत्यांची नावे असतील तर त्यांचीही चौकशी व्हावी. स्त्रीपुरुष भेदभाव नसावा.पण फक्त अभिनेत्रींचीच कशी नावे येत आहेत हा प्रश्न दुर्लक्षित करू नये एव्हढेच!, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट पणे सांगितले आहे.
दरम्यान, बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. त्यानंतर एनसीबीकडून तपासणीला वेग आला असून एनसीबीने सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि श्रद्धा कपूरची आज चौकशी केली.