काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी
प्रतिनिधी/ मुंबई
एनसीबीने मोठा गाजावाजा करून क्रुझवरील ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला. अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटकही केली. मात्र त्यानंतर या प्रकरणात अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. आर्यनला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गुन्हेगार आणि मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर सैलने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितले होते. पण 18 कोटींचा सौदा झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच एनसीबी अधिकाऱयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. त्याने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याची तात्काळ दखल घेऊन उच्चस्तरीय समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.