काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये दुर्घटना- 30 ते 40 जण बेपत्ता- बचावकार्य सुरू
श्रीनगर, शिमला / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये संततधार पावसादरम्यान ढगफुटीच्या घटनाही घडल्या आहेत. विविध घटनांमध्ये जवळपास 16 जणांचा बळी गेला असून अजूनही 30 ते 40 लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली आहे.
किश्तवाड जिल्हय़ातील एका गावात ढगफुटी होऊन त्यात 4 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या ढगफुटीत किमान 30 लोक बेपत्ता झाले असून 19 घरे आणि 21 झोपडय़ा वाहून गेल्या आहेत. लडाखमध्ये कारगिल जिल्हय़ात दोन भागात अशाच दुर्घटना घडल्या असून तेथे जवळपास 12 घरांना फटका बसला आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्येही ढगफुटीच्या घटनांमध्ये 9 जणांचे मृतदेह हाती लागले असून अजून काही लोक बेपत्ता आहेत.
जम्मू प्रदेशातील किश्तवाड जिह्यातील होन्जार गावात बुधवारी पहाटे ढगफुटी झाली. या दुर्घटनेतील 4 मृतदेह सापडले असून 30 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. सद्यस्थितीत बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किश्तवाड जिह्यातील दाछिन परिसरातील होन्जार गावात ढगफुटी झाली. त्यानंतर 30 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. ढिगाऱयाखालून आतापर्यंत आम्हाला चार मृतदेह सापडले आहेत. ही घटना घडली तेव्हा परिसरात 30 हून अधिक लोक असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आल्याचे किश्तवाड जिल्हा पोलीस प्रमुख एसएसपी शफकत भट यांनी सांगितले.
बुधवारी संध्याकाळी अमरनाथ गुहेजवळही ढगफुटी झाली. यात बीएसएफ, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या छावण्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही जीवितहानीची खबर नाही. यावषी अमरनाथ यात्रा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे गुहेजवळ सामान्य लोकांची उपस्थिती नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसानंतर पूरात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 7 अद्याप बेपत्ता आहेत. लाहौल स्पीति येथे मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश पावसानंतर नाल्याला आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत व बचावकार्यावेळी आयटीबीपीच्या पथकाने सायंकाळपर्यंत 6 मृतदेह बाहेर काढले होते.