पक्षात नेतृत्वबदल करण्याबाबत काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वादानंतरही काँग्रेसने आपली स्थितीशील वृत्ती सोडली नसल्याचे दिसून येत आहे. वर्षभर हंगामी अध्यक्षपद सांभाळणाऱया सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा पक्षाची धुरा सोपविणे, हे त्याचे द्योतक मानता येईल. 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसला आजवर अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास पाच ते सहा दशके भारतीय राजकारणावर एकहाती वर्चस्व राहिलेल्या या पक्षाने अनेक चढउतार अनुभवले. फिनिक्सप्रमाणे राखेतून भरारी घेण्याचे वेळोवेळी कसब दाखविणारा हा पक्ष आज मात्र अत्यंत गलितगात्र अवस्थेत आहे. एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजप सर्वदूर हातपाय पसरत असताना राहुल गांधी यांच्यातील धरसोड वृत्तीमुळे काँग्रेसचा जनाधार मात्र झपाटय़ाने घसरलेला पहायला मिळतो. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये यावरूनच असंतोष खदखदत होता. या पार्श्वभूमीवर पक्षातील काही नेते व माजी मंत्र्यांकडून पक्षाध्यक्ष सोनिया गांधींशी पत्रव्यवहार होणे, हे स्वाभाविक वा पक्षीय लोकशाहीला धरूनच म्हणता येईल. मात्र, हे पत्र गांधी घराणे व हुजऱयांनी वैयक्तिकरीत्या घेतल्याने पक्षात खरोखरच लोकशाही आहे का, असा प्रश्न उत्पन्न होतो. मागच्या सहा वर्षात काँग्रेसला जिथे-तिथे सपाटून मार खावा लागला आहे. विविध राज्ये हातातून निसटलीच, शिवाय अनेक जुन्या जाणत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. वास्तविक त्यापासून पक्षाने अथवा गांधी घराण्याने बोध घ्यायला हवा होता. परंतु, पक्षाची वाताहत होत असताना ‘चलता है’ दृष्टिकोन ठेवत कालहरणातच हायकमांडने धन्यता मानली. हे पत्र, त्यातून प्रकटलेला असंतोष हा त्याचाच स्फोट म्हणावा लागेल. सदर पत्रात पक्षाच्या संघटनात्मक संरचनेतील सर्वांगीण बदलाबरोबरच नव्या नेतृत्वाचा आग्रह धरणे, ही कुणाला बंडाची भाषा वाटेल. तथापि, त्यात काही विसंगत आहे, असे म्हणता येणार नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वत: राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद सोनिया यांच्याकडे आले. हे पद पुन्हा स्वीकारण्यास राहुल राजी नव्हते. सोनिया यांची प्रकृती व राहुल यांची उदासीनता पाहूनच ही नेतृत्वबदलाची मागणी झाली, हे ध्यानात घ्यायला हवे. परंतु, स्वपक्षातून प्रकट झालेल्या विचारावर मंथन करण्याऐवजी त्याला भाजपाचे कारस्थान ठरवणे, हा पलायनवाद झाला. आज हाच पळपुटेपणा काँग्रेसकडून पुन्हा दाखविला जात आहे. त्यामुळे वास्तवाला भिडण्याचे सामर्थ्य या पक्षाने गमावल्याचेच अधोरेखित होते. राहुल गांधी एकतर कोणतीही जबाबदारी घेण्यास उत्सुक नसतात. चार-दोन विचारवंतांशी देशाच्या भवितव्याविषयी बोलून गांभीर्याचा आव आणायचा आणि पुन्हा परदेश पर्यटनात रमायचे, यापलीकडे त्यांचे म्हणून काही कर्तृत्व नाही. आज प्रकृतीमुळे काहीशा मर्यादा पडत असल्या, तरी कठीण काळात लढाऊपणा दाखवून सोनियांनी पक्षाला पुन्हा सोन्याचे दिवस दाखवले. तथापि, ही धमक दाखविण्यात राहुल कमी पडतात. त्यात नेतृत्वही घ्यायचे नाही आणि पूर्णपणे सोडायचेही नाही, या त्यांच्या दुटप्पी नीतीमुळे पक्ष आणखी रसातळाला जाण्याची भीती संभवते. पूर्णवेळ नेतृत्व नसल्याने काँग्रेस दिशाहीन होत आहे. त्यामुळे कायमस्वरुपी अध्यक्ष नेमण्याचा सल्ला मध्यंतरी शशी थरूर यांनीही पक्षाला दिला होता. आता इतक्या संघटितपणे हा विचार व्यक्त झाल्यावर तरी त्यावर ऊहापोह व्हायला हवा. त्याऐवजी सोनिया, राहुल वा परिवार समर्थकांनी नाराजी व्यक्त करणे वा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आणखी पुढे ढकलणे म्हणजे ढासळलेल्या इमारतीकडे दुर्लक्ष करण्यासारखेच होय. काँग्रेसचा इतिहास हा निश्चितपणे देदीप्यमान आहे. स्वातंत्र्यलढय़ातील सहभाग, देशाच्या उभारणीतील पक्षाचे योगदान मान्यच करावे लागते. परंतु, वर्तमान आणि भविष्य निश्चितपणे चिंताजनक आहे, असे म्हणता येते. या पक्षाचा श्वास आजही गांधी घराण्यात अडकून पडलेला आहे. नवे नेतृत्व घडविणे, तरुण नेतृत्वाला संधी देणे, जुन्याजाणत्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्याऐवजी राहुल-सोनिया एवढय़ापुरताच पक्ष सीमित राहत असेल, तर आगामी काळात अनेक थोरामोठय़ांच्या परिश्रमातून उभी राहिलेली ही इमारत एक दिवस पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही. होयबा संस्कृती वा हुजऱयांचे उदात्तीकरण हे कोणत्याही पक्षासाठी अत्यंत घातक असते. हे हुजरे कितीही गोडीगुलाबीचे वाटले, तरी नेहमी अवनतीसच कारणीभूत ठरतात. काँग्रेसने हे ओळखून आता तरी शहाणे व्हावे. त्याचबरोबर गांधी घराण्यानेही जागा अडवून ठेवण्यापेक्षा नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे औदार्य दाखवावे. अन्यथा, भविष्यात पक्षाचे मारेकरी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल. एकीकडे काँग्रेसच्या इमारतीला तडे जात असताना दुसरीकडे महाडमध्ये काजळपुरा भागातील ‘तारिक गार्डन’ ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे निकृष्ट बांधकाम, बिल्डर लॉबीचे दुर्लक्ष व अक्षम्य बेफिकिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्या-मुंबईपासून अनेक शहरांमध्ये अधूनमधून अशा घटना घडत असतात. यात आजवर शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, हे सत्र अद्यापही कायमच असल्याचे दिसते. महाडच्या घटनेतही अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, यापासून आता तरी आपण धडा घेणार का, हा खरा प्रश्न आहे. केवळ सात ते आठ वर्षांपूवीं उभारलेली एखादी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणे, हेच मुळात अनाकलनीय असून, बिल्डर लॉबी व प्रशासकीय व्यवस्थेतील अभद्र युतीचाच हा परिपाक मानावा लागेल. या स्तरावरील कारभार असाच ढिसाळ राहिला, तर भविष्यातही अशाच इमारती ढासळत राहतील. म्हणूनच इमारतीच्या वयोमानाबरोबरच बांधकामाचा दर्जाही बारकाईने तपासला गेला पाहिजे. काँग्रेससारखा पक्ष असेल किंवा शहरा-नगरांमध्ये उभ्या राहणाऱया इमारती असतील, मजुबतीकरणावरच भर हवा.
Previous Articleशुभ्र काही भिवविणे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.