अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वेगवान घडामोडी,
प्रतिनिधी/ सातारा
wwप्राथमिक शिक्षकांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असणाऱया प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीतील महत्वाचा टप्पा शुक्रवारी पार पडला. मलाच उमेदवारी हवीय अशा अट्टाहासापायी अर्ज भरलेल्यांचा अर्ज मागे घेण्यासाठी तिन्ही पॅनेलला दुपारी 3 वाजेपर्यंत झगडावे लागले. काहींना तर लक्ष्मीदर्शनही घडवावे लागले असे उघड उघड बोलले जात आहे. त्यानंतर 12 जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात आहेत. संघामध्ये झालेली फूट आणि समितीतील धुसफूस यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत काय होणार याचा सध्यातरी अंदाज बांधणे कठीण आहे. अर्ज माघारीबरोबरच तगडा उमेदवार देण्यासाठी तिन्ही पॅनेलने जोरदार व्यूहरचना आखली आहे.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 4 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होती. त्याकरता शिक्षक भवनाच्या परिसरात दुपारी 3 वाजेपर्यंत राजकीय उलथापालथी मोठय़ा प्रमाणात घडल्या. शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटाची बैठक शिक्षक भवनातील वरच्या मजल्यावर सुरु होती. तर त्या शिक्षक बँक परिवर्तन पॅनेलची तळमजल्यात बैठक सुरु होती. समिती, संभाजीराव थोरात गट आणि दोंदे गटाच्या कार्यकर्त्यांची खलबते शहरातील एका हॉटेलमध्ये सुरु होती. अर्ज कोणाचा ठेवायचा आणि कोणाचा मागे घ्यायचा याबाबत राजकीय डावपेच सुरु होते. खऱया अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वात जास्त अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवसापासून अल्प प्रतिसाद होता. शेवटच्या दिवसांपर्यंत चर्चेच्या बैठकींचे गुऱहाळ सुरु होते. शुक्रवारी त्यास मोठा जोर आला. शिक्षक बँकेत शिक्षक भवनात शिवाजीराव पाटील गटाचे महेंद्र जानुगडे, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ, तुकाराम कदम यांच्यासह पुस्तके गटाचे सिद्धेश्वर पुस्तके, बँकेचे चेअरमन राजेद्र घोरपडे, व्हाईस चेअमन महेंद्र अवघडे, माजी व्हाईस चेअरमन मोहन निकम यांच्यासह महत्वाचे नेते मंडळी कोपऱयातल्या रुममध्ये थांबले होते. ज्यांचे अर्ज मागे घ्यायचे आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना कशा पद्धतीने आपला उमेदवार असेल हे सांगून अर्ज मागे घ्यायला भाग पाडत होते. तर ज्याची उमेदवारी निश्चित करायची होती त्यांना मात्र ते निवडून कसा येणार हे सांग असे वदवून घेतले जात होते. त्यामध्ये काही विद्यमान संचालकांनाही उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. ज्यांना उमेदवारी मिळाले ते मात्र आनंदात होते आणि ज्यांना अर्ज मागे घ्यायला लावला ते आपला अर्ज काढण्यासाठी निवडणूक अधिकाऱयांकडे जाताना दिसत होते.
तळमजल्यामध्ये शिक्षक बँक परिवर्तन पॅनेलचे खलबते सुरु होते. त्यांच्या बैठकीला राजेश बोराटे, गणेश दुबळे, कारंडे, शिवाजी भोसले, सुशांत मोतलिंग यांच्यासह इच्छूक उमेदवार होते. त्यांनी आपले पॅनेल तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच शिक्षक समिती, संभाजीराव थोरात गट आणि दोंदे गट यांची बैठक एका हॉटेलमध्ये सुरु होती. जागा वाटपाचा तिढा सुटून एकीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी समितीचे राज्य पातळीवरील राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, सरचिटणीस किरण यादव, संभाजीराव थोरात गटाचे नेते बलवंत पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत, अखिल भारतीय शिक्षक संघाचे नेते दीपक भुजबळ यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. जागा वाटपाचा तिढा मिटून एकत्र लढण्याचे ठरताच ज्यांना अर्ज मागे घ्यायला लावले आहेत त्यांची नाराजी काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर तीन पॅनेल ठरले असून एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत.
आपली उमेदवारी फायनल झाली बरं का
एक इच्छूक उमेदवार उमेदवारी फायनल झाली हे कळताच पायऱया उतरून खाली गेला. गेटमधून बाहेर पडताच विरोधी गटातला उमेदवार दिसताच दुसऱया कार्यकर्त्याने त्यास तुम्ही तर बिनविरोध होणार होता ना अशी विचारणा केली. त्यावर तो उमेदवार म्हणाला, मतदारांची इच्छा असेल तर बिनविरोध सुद्धा करतील, असे सांगत आनंदी चेहरा घेऊन बाहेर पडला.
आमचा जीव तुझ्यापाशी अन् तुझं मात्र
बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिह्यातून अनेक शिक्षक जमले होते. त्यात एका इच्छूक उमेदवार जरा घाईतच निघाला होता. त्याला गेटच्या जवळ उभे राहिलेल्या दोन शिक्षकांनी थांबवत काय लेकाच्या आमचा जीव तुझ्यावर आणि तुझा जीव, अशा शब्दात त्यांच्याशी संवाद साधला. त्यावर तोही मला वेळेत जावू द्या. अर्ज काढायचा आहे, असे म्हणत त्याने तेथून पळ काढला.
उमेदवारी विकले गेले
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत तीन पॅनेल पडलेले असून ज्यांना संचालक बनायचे आहे त्यांनी समोरच्याचा अर्ज मागे घेण्यासाठी काही बोली सुद्धा लावल्या असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळे उमेदवारीच विकली गेली असल्याची खमंग चर्चा सुरु होती. 6 आकडय़ाची रक्कम भरा तरच तुमची उमेदवारी ठेवा, अशा जाचक अटी घालून उमेदवारी विकल्याची जोरदार चर्चा सुरु होती.
नाराज असल्याची सगळीकडे चर्चा शिवाजीराव पाटील आणि समितीच्या पॅनेलमध्ये अनेकांना डावलले गेल्याने त्यांच्यामध्ये नाराजीची जोरदार चर्चा सुरु होती. शिवाजीराव पाटील गटाचे कार्यकर्त्यांमध्ये समितीत अनेकजण नाराज आहेत ते आमच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरु होती. तर समिती, थोरात आणि दोंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्या संपर्कात शिवाजीराव पाटील गटाचे आहेत, अशी चर्चा सुरु होती.