‘सागर सर्वेक्षक’ इंधनवाहू जहाज सापडले होते चक्रीवादळात
प्रतिनिधी / वास्को
तौक्ते चक्रीवादळात अडकून संकटात सापडलेल्या ओएनजीसीचे एम. व्ही. सागर सर्वेक्षक या जहाजाला भारतीय तटरक्षक दलाने 52 खलाशांसह सुखरूप वाचवले. चक्रीवादळ गोव्याला धडकण्यास सुरूवात होताच ही घटना घडली होती. या बचाव कार्याव्दारे तटरक्षक दलाने गोव्याच्या सागरी पर्यावरणावरील संकटही दूर केले आहे.
ओएनजीसीचे ‘सागर सर्वेक्षक’ हे जहाज गोव्याजवळील खोल समुद्रातून मुंबई बंदराकडे निघाले होते. 92 मिटर लांब असलेल्या या जहाजात इंधन व 52 खलाशी होते. गोव्याला वादळाचा तडाखा बसण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे हे जहाज या वादळाच्या तडाख्यात सापडले. वादळी हवामानामुळे या जहाजाचे इंजिन बंद पडून हे जहाज बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. रविवार 16 रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास गोव्यातील भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला या धोकादायक परिस्थितीची माहिती मिळाली. त्यामुळे दलाने त्वरित हालचाली करून घटनास्थळी कुच केले. तटरक्षक दलाच्या मदतीमुळे हे जहाज सकाळी पावणे दहाच्या सुमारास सुरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले. हे जहाज व त्यावरील 52 खलाशांना सुरक्षितरित्या वाचवण्यासाठी तटरक्षक दलाने 5 तास खर्ची घातले.
भारतीय तटरक्षक दलाने या बचाव कार्यात केवळ ओएनजीसीचे सागर सवेंक्षक जहाज व त्यावरील 52 खलाशांनाच नव्हे तर गोव्याच्या समुद्रावर होऊ घातलेले पर्यावरणीय संकटही दूर केले आहे. या जहाजाला एखादी ठेच लागली असती तर गोव्याचे सागरी पर्यावरण समुद्रकिनाऱयासह धोक्यात आले असते.