प्रतिनिधी / वैराग
सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा तर बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या तडवळे बंधाऱ्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजू खचल्या असून बंधाऱ्यास धोका निर्माण झाला आहे. परीणामी मनगोली धानोरे, मानेगाव कडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे .
बार्शी तालुक्यातील मुख्य नदी असलेल्या भोगावती नदीवर तडवळे येथे सर्वात मोठा ७२ दरवाजांचा बंधारा उभारण्यात आला आहे. यामध्ये पाणी आडले की प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या यावली, ढोराळे, तडवळे, धानोरे, दहीटणे, मुंगशी, मनगोली, कापसेवाडी अशा मोहोळ, माढा आणि बार्शी तालुक्यातील आठ ते दहा गावांना फायदा होतो. त्यामुळे तडवळे बंधारा ह्या पंचक्रोशीत महत्वाचा आहे. अतिवृष्टीमुळे अचानक आलेला पाऊस आणि ढाळे पिंपळगाव व हिंगणी मध्यम प्रकल्प भरल्यामुळे आलेले पाणी यामुळे बंधाऱ्यावरुन चार फूट पाणी वाहत होते.
यामध्ये बंधाऱ्याच्या दोन्ही बाजू सुमारे पन्नास फूट लांब व दहा फूटांपर्यंत खोल खचल्या आहेत. बंधाऱ्यावरील संवरक्षक रोलिंग वाहून गेले आहे. बंधाऱ्यावर वाहून आलेले सोयाबीन मोठ्या प्रमाणावर अडकले आहे. धामणगाव ( दु ) या गावाला वैरागहून जोडणाऱ्या रस्त्यावरील नागझरी नदीवर उभारण्यात आलेल्या को.प. पद्धतीच्या बंधाऱ्याची अवस्थाही अशीच झाली असून पाण्याच्या प्रचंड दाबाने भरावच वाहून गेला आहे.केवळ बंधाऱ्याचा सापळा उभा दिसत असून हा बंधारा धोकादायक बनला आहे. यावरुन आता वाहतूक बंद झाली आहे. पिंपरी (सा),उपळे, हळदुगे जामगाव, झाडी, कापसी, सावरगाव, भातंबरे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व वाऱ्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होऊन शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी वाहून गेल्या, झाकून ठेवलेलं सोयाबिन कागदाच्या होडी प्रमाणे पाण्याबरोबर वाहून गेले. शेतातील सोयाबिन पाण्यात भिजून त्यास कोंब फुटले आहेत. पावसाच्या व वाऱ्याच्या तडाख्यात ऊस भुईसपाट झाला. चिखलात कांद्याचा रेंदा झाला तर अनेकांच्या द्राक्ष बागेत गुडगाभर पाणी साचले. पिंपरी गावचे ग्रामदैवत असणाऱ्या ईश्वर मंदिराचा कळस वाहून गेला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.