मेजर जनरल पातळीवरील चर्चेचे फलित : भूसेनाप्रमुख नरवणे यांची लेहला भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यावर भारत आणि चीन यांच्यात एकमत झाले आहे. सोमवारी दिवसभर दोन्ही देशांमध्ये मेजर-जनरल पातळीवर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घोषित करण्यात आला. दोन्ही सेना त्यांच्या 5 मे पूर्वीच्या स्थितीत परत जातील असे ठरविण्यात आले. मात्र यासंबंधीच्या वेळापत्रकावर अद्याप निर्णय झाला नसून तो राजकीय चर्चेनंतर होण्याची शक्यता आहे.
सोमवारी दोन्ही देशांच्या वरीष्ठ सेनाधिकाऱयांमध्ये चीनच्या सीमेत साधारणतः 11 तास चर्चा झाली. मात्र सोमवारी या चर्चेचा तपशील घोषित करण्यात आला नव्हता. तो मंगळवारी सांगण्यात आला. त्यानुसार दोन्ही सेनांनी संघर्षाचा पवित्रा टाळून शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिल्याचे दिसून आले.
भूसेनाप्रमुख लेह दौऱयावर
भारताचे भूसेना प्रमुख मनोज नरवणे यांनी सीमेवरील परिस्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी लेह व लडाख भागाचा दौरा मंगळवारी केला. त्यांनी सीमेवरील सैनिकांशी संवाद साधला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे व भारताच्या सीमांना धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी लडाखचे भाजपचे खासदार नामग्याल यांच्याशीही चर्चा केली. 15 जूनच्या संघर्षानंतर ही त्यांनी प्रथमच लेह लडाख भेट होती. त्यामुळे या भेटीचे महत्व मोठे आहे असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
गालवानचा प्रश्न नाही
भारताच्या गालवान खोऱयात चीनी सैन्याने अतिक्रमण केलेले नाही, ही बाब आता अधिकाधिक स्पष्ट होत आहे. चीनने या खोऱयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तो हाणून पाडण्यात आला. चीनचा प्रयत्न उधळून लावतानाच 20 भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्त झाली, असे आता स्पष्ट झाले आहे.
अमेरिकन गुप्तचरांचा पुनरूच्चार
काही दिवसांपूर्वी लडाख मध्ये झालेल्या भारत-चीन संघर्षात चीनचे किमान 35 सैनिक मारले गेले, या आपल्या अहवालाचा पुनरूच्चार अमेरिकेच्या गुप्तचरांनी केला आहे. या संघर्षाचे चलतचित्रणही प्रसारित होत आहे. तथापि, त्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. चीनने केलेला हल्ला त्याच्यावरच उलटला आणि त्याचे जास्त नुकसान झाले, असे अमेरिकन गुप्तचरांनी स्पष्ट केले.
हल्ला पूर्वनियोजितच
चीनने भारताच्या सैनिकांवर केलेला हल्ला पूर्वनियोजितच होता. चीनचे कमांडिंग अधिकारी शिऑन यांनी हा हल्ला करण्याचा आदेश दिला होता. मात्र प्रारंभी प्रहार झेललेल्या भारतीय सैनिकांनी नंतर चीनलाच दणका दिला. त्यामुळे चीनची जीवीत हानी मोठय़ा प्रमाणात झाली, असे जागतिक स्तरावर स्पष्ट होत आहे.
नेमकी स्थिती काय ?
चीनने भारताच्या भूमीत घुसखोरी केली आहे काय, या प्रश्नावर अद्यापही चर्चा होत आहे. चीनने त्याच्या भागात मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे व चिलखती गाडय़ा आणल्या आहेत. तसेच क्षेपणास्त्र यंत्रणाही सज्ज ठेवली आहे. तथापि, भारताची कोणतीही चौकी त्याच्या ताब्यात गेलेली नाही, असे आता तज्ञही मानत आहेत. पेंगॉन सरोवराच्या परिसरात मुख्य समस्या असली तरी तेथेही परिस्थिती भारताच्या हाताबाहेर गेलेली नाही, असे भारतीय सेनेचे म्हणणे आहे.
राजनाथसिंग रशियात
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी रशियाचे उपपंतप्रधान ओव्हरशुक यांची भेट घेतली. दोन्ही देशांनी परस्पर संरक्षण संबंधी महत्वाच्या मुद्दय़ांवर बोलणी केली असे सांगण्यात आले. भारत-चीन विवादात रशिया लक्ष घालणार नाही, असे त्या देशाने स्पष्ट केले. भारताचीही तीच मागणी होती. चीनशी चर्चा करण्यास भारत समर्थ असून तिसऱया पक्षाची मध्यस्थी आवश्यक नाही ही भारताची भूमिका आहे.
काँगेसवर कारस्थानाचा आरोप
लडाख येथील परिस्थितीवर भाजप आणि काँगेस यांच्यात शब्दयुद्ध सुरूच आहे. काँगेसने मंगळवारी पुन्हा एकदा सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. चीनने भारताची भूमी ताब्यात घेतली आहे काय, याचे स्पष्ट उत्तर सरकारने द्यावे असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. काँगेसच्या कार्यकारिणीची बैठकही मंगळवारी पार पडली. या बैठकीत भाषण करताना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्था आणि सीमेवरील परिस्थिती संबंधी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत, अशी कठोर टीका सोनिया गांधी यांनी केली. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँगेसच्या टीकेचा समाचार घेतला. देशाची एक इंचही भूमी गमावलेली नाही, या विधानाचा त्यांनी पुनरूच्चार केला. देशाने भूमी गमावलेली नाही, मात्र काँगेसने लाजलज्जा गमावलेली आहे, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली. काँगेस आता देशाच्या सेनेलाच शत्रूस्थानी मानत असून सेनेच्या क्षमतेवर संशय घेत आहे. हा कटकारस्थानाचा भाग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला,
दिवसभरात महत्वाच्या घडामोडी
ड भारत-चीन सेनाधिकारी चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्याचे स्पष्ट
ड भूसेना प्रमुख नरवणे यांनी परिस्थिती सामान्य असल्याचे केले विधान
ड तणावमुक्तीस चीनची संमती असली तरी भारत सावधानच राहणार
ड लडाखमधील परिस्थितीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप अद्यातही सुरूच