सीमा संघर्ष प्रकरणी चीनचा नरमाईचा सूर, तसूभरही मागे न हटण्याचा भारताचा निर्धार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताबरोबरचा सध्याचा तणाव सामोपचाराने मिटविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा काहीसा नरमाईचा सूर आता चीनने लावला आहे. लडाख येथे सीमारेषेवर भारत आणि चीन यांचे सैनिक एकमेकांसमोर गेले 21 दिवस संघर्षाच्या पवित्र्यात उभे असताना, दोन्ही बाजूंनी संयमाने परिस्थिती हाताळावी असे आवाहन चीनच्या विदेश व्यवहार विभागाने केल्याने तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चीनचे भारतातील राजदूत सन विडोंग यांनी भारताबरोबर प्रगाढ संबंध प्रस्थापित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. दोन्ही देश एकमेकांसह सामंजस्याने वागू शकतात, असे त्यांनी तरूण नेतृत्व परिषदेच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रतिपादन केले. दोन्ही देशांनी कधीही त्यांच्यातील मतभेदांना त्यांच्यातील संबंधांपेक्षा वरचे स्थान देऊ नये. चर्चेतून तोडगा काढण्यावर आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. दोन्ही देश कोरोना विषाणूशी एकोप्याने संघर्ष करीत आहेत. हेच मधुर संबंध सर्व क्षेत्रांमध्ये विकसीत होणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
सीमेवर स्थिती नियंत्रणात
चीनच्या विदेश विभागानेही आता संयमाचा सूर लावला आहे. सीमेवरची संघर्ष स्थिती आता स्थैर्याकडे वाटचाल करीत असून नियंत्रण योग्य बनली आहे. सीमावादासंबंधी चीनचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही दोन्ही देशांमध्ये व त्यांच्या नेत्यांमध्ये झालेल्या करारांचे सक्तीने पालन करण्याच्या विचाराचे आहोत. यासाठीच सीमेवर गस्त घातली जात आहे, असे विधान चीनचे विदेश व्यवहार प्रवक्ता झाओ लिजिआन यांनी बुधवारी केले. त्यामुळे तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसत आहे, असे मत अनेक विदेश व्यवहार तज्ञांनी व्यक्त केले.
भारताची जय्यत तयारी
चीनच्या कोणत्याही प्रकारच्या दबावासमोर न झुकण्याचे धोरण भारताने दोन दिवसांपूर्वीच घोषित केले होते. बुधवारी त्याचा पुनरूच्चार करण्यात आला. सीमेवर दोन हात करण्याची वेळ आल्यास त्यालाही न डगमगता तोंड देण्यास सेना सज्ज आहे. भारतानेही चीनप्रमाणेच लडाखच्या संवेदनशील भागांमध्ये आपल्या सैनिकांची संख्या वाढविली असून आवश्यक ती यंत्रसामग्री आणि शस्त्रास्त्रेही आणली आहेत. भारताच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेतच रोखले असून भारतीय भूमीत अतिक्रमण करण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
अमेरिकेची मध्यस्थीची तयारी
भारत आणि चीन यांच्यातील वाढता तणाव कमी करण्यासाठी अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले. मध्यस्थी करण्याची आमची इच्छा असून तशी आमची क्षमताही आहे, असे प्रतिपादन ट्रंप केले. यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ट्रंप यांनी काही महिन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्येही मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि नंतर, दोन्ही देशांची इच्छा असेल तरच तसे करू असेही स्पष्ट केले होते. भारत आणि चीन यांच्या सीमारेषेवर अनेक स्थानी दोन्ही देशांनी मोठी सामरिक सज्जता ठेवली आहे. दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. असा स्थितीत अमेरिकेच्या मध्यस्थीची आवश्यकता वाटल्यास ती करण्यास आम्ही तयार आहोत, असे स्पष्ट विधान अध्यक्ष ट्रंप यांनी केले.
ड्रगन आणि हत्ती एमेकांसोबत...
ड्रगन (चीनचे चिन्ह) व हत्ती (भारतातील लोकप्रिय प्राणी) एकमेकांबरोबर नाचू शकतात, असे सूचक विधान चीनचे भारतातील राजदूत सन विडोंग यांनी केले. दोन्ही देशांमधील युवकांनी दोन्ही देशांच्या संबंधांचा अर्थ आणि महत्व समजून घेतले पाहिजे. एकमेकांशी सहकार्य करून राहण्यातच सर्वांचे भले आहे, असे प्रतिपादन त्यांनी तरूण नेतृत्व परिषदेत भाषण करताना केले.