प्रसाद नारकर यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी / कणकवली:
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या तपासणीकरिता तपासणी नाक्यांची संख्या वाढविण्यात यावी, यासाठी संबंधित खात्याचे मंत्री व गृहमंत्री यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद नारकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे, चाकरमान्यांना कोकणातील सर्व जिल्हय़ांमधील ग्र्रामपंचायती, जिल्हा परिषद व नगर परिषदा यांनी गणेशोत्सवाच्या 14 दिवस अगोदर सणाकरिता येण्याचे आवाहन केले आहे. तथापी, खारेपाटण येथे एकच तपासणी नाका असल्याने सद्यस्थितीत प्रवाशांना चार ते पाच तास ताटकळावे लागते. विलंब व सर्वच प्रवासी एकाच तपासणी नाक्यावर ताटकळत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढत आहे. याकरिता तळेरे येथून वैभववाडीकडे जाणाऱया रस्त्यावर एक तपासणी नाका व विजयदुर्ग, देवगड तालुक्यात जाताना येणाऱया अनुक्रमे कासार्डे व नांदगाव तिठा येथे तपासणी नाके सुरू केल्यास खारेपाटण तपासणी नाक्यावर होणारी गर्दी टाळता येईल व कोकणात वैभववाडी, विजयदुर्ग, देवगड व इतर तालुक्यांत जाणाऱया प्रवाशांना विनाविलंब प्रवास करता येईल तसेच प्रशासन यंत्रणेवर पडणारा ताणही हलका होईल, याकरिता संबंधित खात्याचे मंत्री व गृहमंत्री यांना सूचना द्याव्यात.