पानसरे खून खटल्याची सुनावणी 2 मार्च रोजी
कोल्हापूर प्रतिनिधी
ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग 1 बी. डी. शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी संशयीत आरोपींचे वकील ऍड. विरेंद्र इचलकरंजीकर यांनी काही महत्वाच्या पुराव्यांसह इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची माहिती सरकार पक्षातर्फे मिळावी अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयात केली. पुढील सुनावणी बुधवार (2 मार्च) रोजी होणार आहे.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष पथकाने 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्रही न्यायालयामध्ये सादर केले आहे. यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोघेजण फरार आहेत. संशयीत आरोपी समीर गायकवाड, विरेंद्र तावडे, सचिन अंदुरे या तिघांविरोधात विशेष तपास पथकाने कोणतेही ठोस पुरावे न्यायालयात सादर केले नाहीत. यामुळे या तिघांना दोषमुक्त करावे, अशी मागणी ऍड. समीर पटवर्धन यांनी अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र ऍड. समीर पटवर्धन न्यायालयात हजर राहू शकले नसल्याने या अर्जावर सुनावणी झाली नाही. दरम्यान संशयीतांच्या वतीने शुक्रवारी ऍड. विरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात अर्ज दिला. त्यांनी काही महत्वाचे पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे सरकार पक्षातर्फे अद्याप मिळाले नाहीत. ते मिळावेत अशी मागणी केली. सरकारी वकील ऍड. शिवाजीराव राणे यांनी जसा तपास होईल तसे पुरावे दोषारोपपत्रामध्ये दाखल केले आहेत. तरीही काही पुरावे आरोपींना मिळाले नसले तर ते देण्याची व्यवस्था केली जाईल. असे स्पष्ट केले. यानंतर ऍडव्होकेट इचलकरंजीकर यांनी पुरावे मिळाल्यानंतर काही दिवसांनी सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. यानुसार पुढील सुनावणी 2 मार्च रोजी होणार आहे.