अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी बिहारमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी वर्ग करण्याचा आदेश दिला आहे. सुशांतची आत्महत्या फिल्म इंडस्ट्रीतील नेपोटिझमचा प्रकार असल्याच्या खळबळजनक आरोपापासून ते त्याला रिया चक्रवर्तीने लुबाडल्याच्या सुशांत याच्या वडिलांच्या आरोपापर्यंत अनेक खळबळजनक कथानके पुढे आली. त्यातील सर्वात चर्चित कथानक हे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे याप्रकरणी नाव गोवल्याचे ठरले. विरोधी पक्ष भाजपने आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता राज्यातील ’एक तरुण मंत्री’ वगैरे उल्लेख करत तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यासाठी नारायण राणे, अतुल भातखळकर, आशिष शेलार यांनी आरोप केलेच होते. वरून फडणवीस दांपत्यानेसुद्धा मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. त्यात मूळ आत्महत्या प्रकरणापेक्षा महाराष्ट्र आणि बिहार राज्याच्या पोलिसांचे आणि दोन राज्यातील राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपही अधिक चर्चेत आले. दरम्यान बिहार पोलिसांनी हे प्रकरण महाराष्ट्र आपल्याला तपास करू देत नसल्याने सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती आणि त्याविरोधात रिया कोर्टात गेली होती. सीबीआय चौकशी हा निर्णय अपेक्षित होता. कोणत्याही एका राज्याकडे तपास सोपवला तर त्यात पक्षपाताचा आरोप हमखास ठरलेला होता. अर्थात सीबीआय ही तपास यंत्रणा राज्यकर्त्यांना अनुकूल तपास करण्याबद्दल कुख्यात आहेच. देशात सत्तांतर झाले की, सत्तारूढ पक्षाशी जवळीक असणाऱया आरोपींच्या बाजूने म्हणणे मांडत किंवा आपणच ठेवलेल्या आरोपपत्रानुसार पुरावेही सादर न केल्याने विविध न्यायालयांनी अनेकदा सीबीआयला फटकारले आहे. त्यामुळे सीबीआय म्हणजे सत्ताधारी पक्षाचा पोपट अशी टीका कायम होत असते. मात्र तरीही न्यायालयाला अन्य पर्यायही नाही. त्यांना सत्य उघडकीस येणे अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकरण सोपवले असल्याने सीबीआयला मुंबईत दाखल असणारी आत्महत्येची प्रथम तक्रार आणि बिहारमध्ये दाखल असणारी वडिलांची रिया चक्रवर्तीने लुबाडल्याची तक्रार या दोन्ही तक्रारीसह अतुल भातखळकर यांच्या ’तरुण मंत्र्या’च्या बाबतीतील लेखी तक्रारीची चौकशीही करावी लागणार आहे. अर्थात भातखळकर यांनी ही तक्रार केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केलेली असल्यामुळे आपोआपच यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांचे तपासाबद्दलचे निर्देशही महत्त्वाचे ठरतील. या प्रकरणी यापूर्वीच चौकशीची मागणी करणाऱया आणि शरद पवार यांनी फटकारलेले त्यांचे नातू पार्थ पवार यांनी ’सत्यमेव जयते’ असे स्व समर्थनाचे ट्विट केलेले आहे. नितेश राणे यांनीही मजा आल्याचे ट्विट केले आहे. यामुळे सुशांतची आत्महत्या एका बाजूला राहून हे प्रकरण पूर्णतः राजकीय होण्याचीही शक्मयता बळावली आहे. बिहार पोलिसांनी या प्रकरणी घेतलेली आघाडी ही तोंडावर असलेल्या बिहार निवडणुकीमुळे आहे असे प्रथम मानले जात होते. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड होण्याचे संकेत मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात या प्रकरणाचा वापर करण्यासाठीच फडणवीस यांची नियुक्ती केल्याचा आरोप ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. म्हणजे राजकारण दुसऱया बाजूनेही सुरू झाले आहे. त्यात पार्थ पवार यांची कृती बंडाची दिसते आहे. त्यामुळे त्यामागे अजितदादा आहेत का आणि इतर गैरभाजप राज्यात सत्तेचा जो खेळ रंगला तसा महाराष्ट्रात रंगेल का ही चर्चाही उठेल. शिवाय या दबावातून शिवसेना पुन्हा भाजपशी नाईलाजाने जुळवून घेईल का यावरही चर्चा सुरू होईल. सेनेशी भाजपचे जुळले तर पार्थ पवार आणि राणे यांचे भवितव्य काय यावरही चर्चा उठेल. अर्थात त्या दूरच्या गोष्टी. या चौकशीला आदित्य ठाकरे यांना जेव्हा सामोरे जावे लागेल त्यावेळी यावर चर्चा सुरू होईल. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची यापूर्वी मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी, त्यांचे त्याबाबतीत म्हणणे, महाराष्ट्र सरकारची याबद्दलची भूमिका हे अद्याप जाहीर व्हायचे आहे. राज्य सरकार याप्रकरणी फेरविचार करण्याबाबत याचिका दाखल करते का? केली तर कुठल्या मुद्यावर? हेही स्पष्ट व्हायला काळ जावा लागणार आहे. तोपर्यंत कोर्टाचे स्पष्ट आदेश काय आहेत तेही पुढे येईल. मात्र त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा तापायला लागेल हे मात्र निश्चित. महाराष्ट्राच्या राजकारणात एक यापूर्वीच्या परंपरेपेक्षा वेगळे राजकारण घडले आहे. भाजपला बाजूला ठेवून दोन प्रादेशिक आणि एका राष्ट्रीय पक्षाची आघाडी झाली आहे. त्यातून प्रेरणा घेऊन इतर राज्यातही प्रयोग झाले आहेत. या प्रयोगाचे भवितव्य याप्रकरणात दिसून येईल. आजपर्यंत भाजप विरोधात ठाम राहिलेले तीन पक्षातील आमदार यातून गडबडतील का? केंद्र सरकारतर्फे इतर आणखी कोणती आयुधे महाराष्ट्रात वापरली जातील हेही पुढे येणारच आहे. एकूणच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी घडवून आणलेले वेगळे राजकारण एकीकडे आहे तर दुसरीकडे सीबीआयचा परंपरागत वापर आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रभावी प्रादेशिक नेतृत्व सीबीआयच्याच वेसणाने आजपर्यंत सर्व केंद्रीय सरकारांनी काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस किंवा भाजप त्याला अपवाद नाही. राज्यसभेत त्याचे प्रत्यंतर अलीकडे आलेले होतेच. त्या पद्धतीने महाराष्ट्रात यापूर्वी अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली होती. योगायोग म्हणजे त्यांच्यावरील सर्व आरोपातून त्यांना ‘क्लीन चिट’सुद्धा मिळाली होती. राजकारणात असे पवित्र केले जातेच! मग त्यासाठी यंत्रणांचा वापर हा दुतर्फा होताना दिसतो. भविष्यात ठाकरे काय भूमिका घेतात आणि पवारांच्या कुटुंबात कोणती वादळे उठतात यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. या वादळात सुशांतसिंह प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागायचा राहू नये इतकेच!
Previous Articleअरे! अँकर अँकर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.