ऑनलाईन टीम / लखनऊ :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ही वाढ तबलिगी जमातीमुळे होत आहे असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. तसेच तबलिगी जमातीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
ते म्हणाले, तबलिगी जमातीने कोरोना लपवला. त्यांनी कोरोना व्हायरसचे वाहक म्हणून काम केले त्यामुळे आज कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यांनीच हा विषाणू विविध ठिकाणी पसरवला आहे. नाहीतर आपण लॉक डाऊनच्या पहिल्याच टप्प्यात यावर नियंत्रण मिळवले असते, असं त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, आजार होणे हा गुन्हा नाही पण आजार लपवणे हा फार मोठा अपराध आहे. त्यांचे हे कृत्य चुकीचे आहे. त्यामुळे तबलिगींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.
दरम्यान, उत्तर प्रदेशात आतापर्यंत दोन हजार पेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 20 पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.