सोनुर्ली रेवटेवाडीत वीज समस्यांनी चार ग्राहक हैराण : पावसाळापूर्व कामे वेळीच होण्याची गरज
नीलेश परब / न्हावेली:
रॉकेलचा पुरवठा बंद, घरात अनेक दिवस वीजपुरवठा नाही. त्यामुळे न्हावेली रेवटेवाडीतील चार ग्राहक हैराण झाले. बांदा-शिरोडा मार्गावर असलेल्या न्हावेलीतील रेवटेवाडीत विजेची समस्या प्रामुख्याने सतावत आहे. त्यातच आता पावसाळा जवळ आल्याने हे संकट दूर न झाल्यास पूर्ण पावसाळा अंधारात राहावे लागणार की काय, अशी भीती या ग्राहकांना सतावत आहे.
न्हावेली रेवटेवाडीतील 54 ग्राहक हे बांदा-2 मध्ये येतात, तर चार ग्राहक सावंतवाडी अंतर्गत येतात. येथील ग्राहकांना काही समस्या असल्यास बांदा-2 अंतर्गत येणाऱया वायरमनना सांगणे सोपे ठरते. परंतु, सोनुर्ली लाईनवरच्या वायमरनशी संपर्क करणे कठीण होते. त्यामुळे या चार ग्राहकांनाही बांदा-2 अंतर्गत सामावून घेण्याची मागणी पाडलोस तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.
रेवटेवाडी येथील जयश्री सोनू परब यांच्या घरात तब्बल दहा दिवसांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. संबंधितांना वारंवार कळवूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने तब्बल दहा दिवस त्यांना अंधारात राहवे लागले. अखेर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय उचलून धरला. अशी घटना पुन्हा कोणाही वीज ग्राहकावर येऊ नये, असे वीजपुरवठा सुरळीत करण्यास आलेल्या वायरमनला ग्रामस्थांनी सांगितले.
पावसाळा जवळ येत असल्याने पावसाळय़ापूर्वी वीजपुरवठय़ात येणाऱया सर्व संभाव्य अडथळय़ांची पाहणी करण्यात यावी. तसेच सर्व समस्या वेळीच मार्गी लावत अखंडित आणि सुरक्षित पुरवठा करणे आवश्यक असल्याचे कुबल यांनी सांगितले.
स्वतंत्र ट्रान्सफार्मरची गरज
पाडलोस-केणीवाडा येथे असलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून सोनुर्ली लाईन गेली आहे. तसेच आरोस ते पाडलोस अशीही लाईन गेली आहे. त्यामुळे सोनुर्ली लाईनवर समस्या निर्माण झाल्यास अन्य चार गाव अंधारत राहत असल्याने सोनुर्ली लाईनसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची गरज असल्याची मागणी होत आहे.