विकेंड लॉकडाऊनमधील शिथिलची माहिती उशिरा दिल्याने व्यापारी, शेतकरी वर्गात नाराजी
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल दोन महिन्यानंतर शनिवारी कांदा पिकाचे सौदे झाले. कर्नाटकासह जिल्हय़ातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विकेंड लॉकडाऊन घोषित केला होता. यामुळे शनिवार, रविवार संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला, दूध डेअरी, किराणा दुकाने आणि औषधालये सकाळी 6 ते 2 पर्यंत चालू ठेवण्याची मुभा दिली
आहे.
बेळगाव बाजार समितीमध्ये आठवडय़ातून दोनवेळा शनिवार, बुधवारी विक्रीसाठी आलेल्या मालांचे सौदे होतात. मात्र विकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारचे सौदे दोन महिन्यापासून बंद ठेवले होते. शनिवारी बाजारात 5 ट्रक कांदा आवक महाराष्ट्रातून झाली होती. त्याचा भाव 1800 ते 2200 रु. असा झाला असल्याची माहिती व्यापारी सिद्धार्थ नरेगावी यांनी दिली.
परराज्यातील बटाटा 1 ट्रक आवक
शनिवारी बाजारात एक ट्रक आग्रा बटाटा आवक होती. मात्र, शुक्रवारी शिल्लक असलेल्या इंदोरचा 5 ट्रक बटाटा आणि गुजरातचा दोन ट्रक बटाटा होता. मात्र बटाटय़ाची ग्राहकाअभावी उचल कमी झाली. परिणामी बटाटय़ाचे भावसुद्धा स्थिर असल्याची माहिती व्यापारी टी. एस. पाटील यांनी दिली. इंदोर बटाटा 1500 ते 1700 रु., आग्रा बटाटा 1300 ते 1400 तर गुजरातचा डिसा बटाटा 800 ते 1050 असा भाव झाला.
जवारी बटाटा 50 पिशव्या तर रताळी 125 पोती
बेळगाव तालुक्यातून होणारी उन्हाळी हंगामातील बटाटा आवक तुरळक प्रमाणात होत आहे. शनिवारी बाजारात 50 पिशव्या बटाटा आवक झाली. त्याचा भाव 1500 ते 1600 रु. असा झाला. रताळी आवक 125 पिशव्या झाली. त्याचा भाव 900 ते 1000 रु. असा झाला असल्याची माहिती व्यापारी विनायक पाटील यांनी दिली.
उशिरा जागृतीचा फटका शेतकरी बांधवांना शनिवारी आणि रविवारी सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला, औषधालये, शेतीविषयक साहित्य विक्री, किराणा दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र याची माहिती बुधवारी, गुरुवारी देणे गरजेचे होते. शनिवारी वृत्तपत्रातून याबाबत सर्वांना माहिती मिळाली. याचा परिणाम शनिवारी बाजारात कांदा व इतर वस्तू खरेदी करणाऱया ग्राहकवर्गावर झाला. परिणामी त्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली. त्यामुळे बाजारात आवक कमी होऊनसुद्धा कांदा दरात 400 रुपयांची घसरण झाली. याबाबत शेतकऱयांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.