ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोएडाच्या तब्बल 2 हजार औद्योगिक संस्थांनी चीनशी व्यापारी संबंध तोडले आहेत. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
भारत-चीनमधील हिंसक संघर्षानंतर चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आता तैवानमधून मागवण्याचा निर्णय या औद्योगिक संस्थांनी घेतला आहे. तैवानकडून इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आत्मसात करून देशातील औद्योगिक घटक विकसित करणे, तसेच त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा यामागचा उद्देश आहे. त्यासाठी या संस्थांनी तैवानच्या अनेक कंपन्यांशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार देखील केला आहे.
सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि विद्युत उद्योगातील 90 टक्के घटक चीनमधून आयात केले जातात. मात्र, चीन आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावामुळे नोएडाच्या कंपन्यांनी त्यांच्या ऑर्डर्स रद्द केल्या आहेत. या वस्तूंची आयात आता तैवानमधून करण्यात येणार आहे.