प्रतिनिधी / रत्नागिरी :
कोरोना महामारीमुळे एसटीची थांबलेली चाके गुरूवारपासून खऱया अर्थाने गतीमान झाली. तब्बल पाच महिन्यानंतर लालपरी जिल्हय़ाबाहेर रवाना झाली, मात्र पहिल्या दिवशी त्याला अत्यल्प प्रतिसाद लाभला. गुरूवारी रत्नागिरी विभागातून कोल्हापूर मार्गावर 10 गाडय़ा सोडण्यात आल्या, तर रत्नागिरी जिह्यात केवळ 6 गाडय़ा दाखल झाल्याची माहिती एसटी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी बुधवारी केली होती. त्यानंतर गुरूवारी पहिल्या दिवशी जिल्हयातून 10 गाडय़ा सोडण्यात आल्या. जिल्हय़ाबाहेर जाण्यासाठी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून आणखी गाडय़ा वाढवण्यात येणार आहेत. सातारा, पुणे, सोलापूर या मार्गावर बसेस सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती भोकरे यांनी दिली.
सध्या असलेल्या तिकीट दरातच सोशल डिस्टस्टींग ची अमलबजावणी करून प्रवासी सेवा देण्यात येणार आहे. या प्रवासाला ई पासची आवश्यकता नाही. पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला तरी टप्याटप्याने हा प्रतिसाद वाढेल, अशा विश्वास रत्नागिरी विभाग ने व्यक्त केला. या गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर शहर बसेस सुद्दा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बाहेर प्रवासासाठी एसटी सेवा सुरू झाल्याची अनेकांना कल्पनाच असल्याने पहिल्या दिवशी प्रवशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र लवकरच लोक पूर्वीप्रमाणे एसटी प्रवास करतील याची खात्री आहे. मात्र प्रवाशांनी योग्य ती काळजी घेऊनच प्रवास करावा असे आवाहनही त्यांनी केले.
13 ऑगस्टनंतर चाकरमान्यांचा प्रतिसाद नाही
गणेशोत्सवासाठी कोकणात 13 ऑगस्ट नंतर दाखल होणाऱयांना कोरोना टेस्ट सक्तीचे होते. टेस्ट करून निगेटीव्ह प्रमाणपत्र असणाऱया चाकरमान्यांना एसटी प्रवास करता येईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याला चाकरमान्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही.