आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकिस सुरुवात, सोशल नियमांचे पालन, कोणतीही भाडेवाढ नाही
सांगली/ प्रतिनिधी
कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून बंद असलेली लालपरीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरूवारपासून सुरू झाली. तब्बल पाच महिन्यानंतर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून लालपरी बाहेर पडली. एसटीने जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कोणत्याही ई-पासची सक्ती राहणार नसल्याने प्रवाशांनी पहिल्याच दिवशी आंतरजिल्हा वाहतुकीस प्रतिसाद दिला.
राज्यात कोरोनामुळे गेले 5 महिने लॉकडाउनमुळे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातही 15
मार्चपासून टप्पाटप्प्याने, तर 23 मार्चपासून एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन काळात
एसटीने अनेक परप्रांतिय मजूर, विद्यार्थी यांना सुरक्षितपणे पोहोचवण्याचेही काम केले. तर 22 मे पासून शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यानंतर आता 20 ऑगस्ट पासून आंतरजिल्हा सेवा सुरू झाल्याने गुरुवारी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांनी स्थानकात गर्दी केली होती.
कोणतीही दरवाढ न करता, प्रत्येक सीटवर एकच प्रवासी याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आंतरजिल्हा प्रवासी
वाहतूक सुरु झाली आहे. सांगली जिल्ह्यातून इचलकरंजी, कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे, सोलापूरसाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रवाशांना ई-पासची आवश्यकता भासणार नाही. सध्या टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात येत असून, 72 गाड्या 138 फेऱ्यांद्वारे 36948 किमी दररोज धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली.