वार्ताहर / दोडामार्ग:
कोनाळ गावातील उदय गवस यांच्या घरात अखेर चौदा वर्षानंतर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी लाईट पेटली. ऐन दिवाळीत संपूर्ण घर प्रकाशमय झाल्याने कुटुंबाने मिठाई वाटून आनंद साजरा केला.
दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ या गावातील तिलारी प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबातील उदय गवस. ते नोकरीलाही तिलारी पाटबंधारे खात्यामध्ये कार्यरत असून पाऊस मोजमाप नोंद विभागात आहेत. चौदा वर्षे काळोखात कुटुंबासह त्यांनी आपल्या जीवनाचा गाडा हाकला. मुलांनी आपले उच्च शिक्षण सुद्धा दिवाबत्तीवर पूर्ण केले. आपल्या घरात कधीच लाईट पेटणार नाही, या निराशजनक भावनेने हताश होऊन उदय गवस व त्याचे कुटुंब आयुष्याचे एक एक दिवस मोजत होते. केंद्र सरकारच्या ‘घर तेथे वीज जोडणी’ या योजनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे यांनी त्यांना दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय वीज जोडणी योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, रमेश दळवी यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता देहारे यांच्याशी चर्चा करून मंजुरी घेतली. यासाठी उपअभियंता देहारे, कार्यकारी अभियंता पाटील, कुडाळचे अधिकारी लोकरे, उपअभियंता पाटील, कनिष्ठ अभियंता चराठे, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, उपसरपंच सूर्या धर्णे, कोनाळ माजी सरपंच बांदेकर व केरळीयन बिजू यांनी विशेष सहकार्य केले.