जय उत्तम नाईक/ पणजी
तब्बल 25 वर्षे पडिक ठेवण्यात आलेल्या जमिनीत पुन्हा शेती पिकवण्याचे प्रयत्न डोंगरी येथील शेतकऱयांनी यशस्वी करून दाखविले आहेत. तेथील नेवरा गावातील दामडा खाजन जमिनीत ही शेती पिकविण्यात आली असून आता ती कापणीयोग्य बनली आहे. या शेतीचे मूळ मालक असलेल्या सुमारे 11 शेतकऱयांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. त्यामुळे या गावात एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रयोगातून प्रोत्साहित झालेले अन्य शेतकरीही आता आपल्या जमिनी कसण्याच्या तयारीस लागले असून पुढील वर्षी शेतकऱयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या 25 वर्षात विविध कारणांमुळे राज्यातील लाखो चौ. मी. शेतजमिनी नापिक बनल्याने पडिक ठेवण्यात आल्या. त्यातील पहिले प्रमुख कारण म्हणजे खाणी आणि दुसरे दर्याचे खारे पाणी. पहिल्या कारणात प्रत्यक्ष खाण परिसर आणि तेथील खनिजाची वाहतूक होणाऱया परिसरातील शेतजमिनींचा समावेश होतो. हा पट्टा कुळे पासून सुरू होऊन धारबांदोडा, उसगाव, पाळी, होंडा, सांखळी, डिचोली, अस्नोडा, ते थेट शिरसई पर्यंत पसरलेला आहे. त्या शिवाय सांगे तालुक्यातही अशाच प्रकारे मोठय़ा प्रमाणात शेतजमिनी पडिक राहिल्या आहेत.
फुटणारे बांध शेतीच्या मार्गातील अडसर
दुसऱया प्रकारातील शेतजमिनी समुद्राच्या खाऱया पाण्याच्या प्रभावाखाली आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नापिक बनल्या आहेत. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी घालण्यात आलेले बांध विविध कारणांमुळे फुटून खारे पाणी शेतात घुसण्याचे प्रकार वाढीस लागले. परिणामी लोकांनी शेती करणेच सोडून दिले. हे बांध फुटणे किंवा मुद्दामहून फोडण्यामागे अनेक कारणे होती. त्यात शेतकऱयांचा एकोपा नसणे, वैरत्वभावना, राजकीय अनास्था, तसेच काही ठिकाणी शेतजमिनींचा मत्स्य, कोळंबी पैदाशीसाठी वापर करता यावा हा हेतू, अशा अनेक कारणांचा समावेश होता. तिसवाडी, बार्देश, पेडणे, फोंडा, आदी तालुक्यात हे प्रकार प्रामुख्याने दिसून येतात.
शेती कामगार मिळणेही मुश्कील
तिसरे कारण म्हणजे आजच्या महागाईत न परवडणारा शेती व्यवसाय. आज शेती म्हणजे ’चार आण्यांची कोंबडी, बारा आण्यांचा मसाला’, असा प्रकार बनला आहे. त्यामुळे शेती करण्यापेक्षा कुठेतरी नोकरी करणे फायद्याचे वाटून कित्येक शेतकऱयांनी नोकऱया पत्करल्या. अनेकांना स्वतः खाण कंपन्यांनीच नोकऱया दिल्या. ज्यांना नोकऱया देणे शक्य नव्हते त्यांना फुकटात किंवा अल्प किंमतीत ट्रक दिले. त्या ट्रकांना कामही स्वतःच दिले. त्यामुळे खाणींद्वारे शेतजमिनींची नुकसानी होत असल्याची ओरड मारणाऱयांची तोंडे बंद करण्यात खाणमालक यशस्वी ठरले.
काहींच्या शेतजमीनी विकासकामांच्या नावाखाली सरकारनेच हडप केल्या. रस्ते, महामार्ग, रल्वे मार्ग बांधण्यातच राज्यातील लाखो चौ. मी. शेतजमिनी दबल्या गेल्या. काहींनी त्या बिगरगोमंतकीयांना विकून टाकल्या, तर काहींच्या जमिनीत भराव घालून मोठमोठी हॉटेल्स, निवासी प्रकल्प उभे राहिले. अजूनही राहात आहेत.
खाणी बंद झाल्या, शेतीला सुगीचे दिवस
या सर्वांचा परिणाम म्हणून मोठय़ा प्रमाणात शेती पडिक राहिल्या, भरीस शेतीकामे करणारे कामगार मिळणेही मुश्कील बनले. गत 25 वर्षात ही परंपरा दुसऱया पिढीकडे गेली. या पिढीला तर शेतीत उतरणेही जमत नाही असे चित्र आहे. अशा परिस्थितीत काही वर्षांपूर्वी राज्यातील खाण व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे हजारो कामगार एका क्षणात बेकार बनले. तरीही खाणी पुन्हा सुरू होतील या आशेवर त्यांनी पुढील एकदोन वर्षे बेकारीतच घालविली. त्या प्रतीक्षेत हाती असलेला सर्व पैसा अडका संपत आला.
रोजीरोटीच्या प्रश्नातून उमगले शेतीचे महत्व
शेवटी रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा अनेकांना पुन्हा आपल्या शेतजमिनींचे स्मरण झाले. परंतु, ’चला उद्यापासून शेती करूया’, म्हटले म्हणून शेती होत नसते. कित्येक वर्षे पडिक राहिलेल्या शेतजमीनी पुन्हा पीक घेण्यायोग्य करण्यासाठी प्रचंड श्रम आणि मेहनत घ्यावी लागते. हळूहळू प्रयत्न सुरू झाले. अनेकांना राजकीय व्यक्ती किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला. शेतीसाठी आज विविध सरकारी योजना तयार आहेत. परंतु त्यांचा फायदा घेण्यासाठी पुढे येणाऱयांची संख्या नगण्य आहे. अनेकांना तर अशा योजनांबद्दल माहितीसुद्धा नसते. अशा शेतकऱयांना काही राजकीय लोकांनी माहिती देऊन त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मदतही केली. त्यातून शेती मशागतीची यंत्रे मिळवून देणे, बी-बियाणे, रोपटी यांचे वाटप करणे, यासारखी मदत त्यांना मिळाली.
मानशींच्या देखभालीअभावी खारे पाणी शेतात
डोंगरी येथील शेतजमीनीं पडिक राहण्यास मात्र वेगळेच कारण होते. या भागातील मानशी व बांध यांची कित्येक वर्षांपासून देखभाल, दुरुस्ती झालेली नव्हती. त्यामुळे झुवारी नदीचे खारे पाणी शिरत होते. त्यातून एवढय़ा वर्षांत पाणी साचून राहिल्यामुळे जमीन पूर्ण दलदलीची बनली होती.
तरीही शेती करणारच असा निर्धार केलेल्या मिननाथ (मिलिंद) शिरगावकर व जनार्दन नास्नोडकर या शेतकऱयांनी याकामी सर्वप्रथम पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांना डोंगरी गावचेच सुपूत्र तथा गत निवडणुकीत सांत आंद्रे मतदारघांचे भाजप उमेदवार प्राध्यापक रामराव (सोमनाथ) सुर्या वाघ यांचे मोठे सहकार्य लाभले. वाघ यांनीच शिरगांवकर यांच्यासह अन्य अनेकांना शेती करण्यासाठी उद्यूक्त केले. सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे बरेच शेतकरी तयारही झाले.
अनेक शेतकऱयांनी दर्शविली तयारी
दामडा कूळ संघटनेने याकामी पुढाकार घेतला. संघटनेचे अध्यक्ष सतीश नाईक यांच्यासह प्रेमानंद नाईक, महेंद्र शिरोडकर, विश्वास नास्नोडकर, शंकर नाईक, लक्ष्मण नाईक, रत्नाकर नाईक, जगदीश नाईक, दीपक मडकईकर, काशिनाथ शिरोडकर, आदी शेतकऱयांनी वाघ यांना साथ देण्याचे मान्य केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली सर्वांनी कृषी खात्याच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क केला. त्यानंतर सुळकर्णे येथील डॉन बॉस्को कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंकळीकर यांनी त्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले. नेवरा येथील संतोष नाईक यांनी ट्रक्टर पुरविला.
जुने गोवे येथील एला फार्म विभागीय कृषी कार्यालयातर्फे त्यांना ’धन-2’ या संकरित जातीची बियाणी मोफत पुरविण्यात आली. पारंपरिक कुरंगूट या प्रकारातीलच हे बियाणे असले तरी त्याचे वैशिठय़ म्हणजे त्याची उंची कमी असते. त्यामुळे जोरदार वारा, पावसाच्या माऱयाने ती आडवी पडत नाही, कुजत नाही, तसेच खाऱया पाण्यातही तग धरून राहते. महत्वाचे म्हणजे भरपूर उत्पन्न मिळते, अशी माहिती श्री. वाघ यांनी दिली.
पुढील हंगामात शेतकऱयांची संख्या वाढण्याचे संकेत
अशाप्रकारे शेतकऱयांच्या अथक कष्टांतून शेती उभी राहिली. पहिल्याच प्रयत्नांतून मिळालेले यश आणि फुललेली शेती पाहून आता अन्य शेतकऱयांनाही प्रोत्साहन मिळाले. हुरूप आला. आता पुढील हंगामात उर्वरित बऱयाच मोठय़ा परिसरात शेती फुललेली दिसून येणार आहे. श्री. वाघ हे याकामी त्यांना सतत मार्गदर्शन करत असून अधिकाधिक शेतकऱयांनी प्न्हा या व्यवसायात उतरावे यासाठी प्रयत्नशील आहेत.
या सर्व प्रयत्नांत सहकार्य करणारे सरकारी अधिकारी, कृषीमंत्री बाबू कवळेकर, प्राध्यापक कुंकळीकर यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थांचे श्री. वाघ यांनी आभार व्यक्त केले आहेत.