प्रतिनिधी/ खेड
चिपळूण-वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे गुरूवारी पहाटे 5 वाजल्यापासून ठप्प झालेला कोकण रेल्वे मार्ग शनिवारी पहाटे 3.45 च्या सुमारास वाहतुकीसाठी खुला झाला. तब्बल 47 तासानंतर या मार्गावरून सर्वप्रथम दिल्लीहून केरळला जाणारी राजधानी एक्सप्रेस मार्गस्थ झाली. 12 रेल्वेगाडय़ा अन्य मार्गे वळवण्यात आल्या. 25 जुलैपासून रेल्वेगाडय़ांच्या 11 फेऱया कोकण मार्गावर धावणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
वाशिष्ठी नदीला पूर येऊन सभोवतालचा परिसर जलमय झाल्याचा फटका कोकण रेल्वेलाही बसला. गुरूवारी पहाटेपासून तुतारी एक्सप्रेस चिपळूण स्थानकात तर अन्य 9 गाडय़ांना ठिकठिकाणच्या स्थानकात थांबा देण्यात आला होता. थांबवलेल्या रेल्वेगाडय़ा शुक्रवारी माघारी धाडल्या गेल्या. शुक्रवारी पूर ओसरल्यानंतर सायंकाळी 7.30 वाजल्यापासून सलग 8 तास भरपावसात दुरूस्ती करत मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत केला. यानंतर राजधानी एक्स्प्रेस केरळच्या दिशेने सर्वप्रथम मार्गस्थ झाली. यानंतर केरळहून मुंबईला जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस रवाना झाली. शनिवारी सकाळी 12 वाजता मडगावहून जनशताब्दी एक्स्प्रेस रवाना झाली.
चौकट
11 फेऱया आजपासून पूर्ववत
रेल्वे प्रशासनाने 28 जुलैपर्यंत अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. मात्र, या फेऱया 25 जुलैपासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दादर-सावंतवाडी, सीएसएमटी मुंबई-मंगळूर, जामनगर-तिरूनेलवेली स्पेशलच्या फेऱयांसह सीएसएमटी मुंबई-मडगावच्या तीन अशा 11 फेऱयांचा समावेश आहे. तब्बल 47 तासानंतर कोकण मार्गावर रेल्वेगाडय़ांची धडधड पुन्हा सुरू झाली आहे.