ऑनलाईन टीम / सातारा :
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र, तरीही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सातारा शहरासह जिल्ह्यात फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. पूर्वीच्या लॉकडाऊनप्रमाणे पोलीस बळाचा वापर करत नसल्याने लोकांचे फावले होते. त्यामुळे ‘मनमाड पॅटर्न’ राबवून रस्त्यावर विनाकारण फिरून गर्दी करणाऱ्यांची ॲन्टिजन टेस्ट करावी, अशी मागणी दै. तरुण भारतने केली होती. आजच्या अंकात प्रकाशित झालेल्या या वृत्ताची दखल घेत पाटण तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्यांची ॲन्टिजन टेस्ट करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज नवे विक्रम मोडीत काढत आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल राज्यातील टॉप टेनकडे होत आहे. दररोजचे धडकी भरवणारे आकडे पाहूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. संचारबंदी केवळ नावालाच राहिली होती. त्यामुळे साताऱ्यात ‘मनमाड’ पॅटर्न राबविण्याची मागणी तरुण भारतने केली होती. अखेर या वृत्ताची दखल घेत काही तासातच पाटणमध्ये प्रशासनाने मनमाड पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेत पाटणचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी आर.बी.पाटील सहभागी झाले होते. कोरोनाची साखळी तोडायची झाल्यास हाच पर्याय जालीम ठरेल, असे अनेकांचे मत आहे.