मुंबई/प्रतिनिधी
राज्यात पुन्हा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. शिवाय, ओमिक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. सध्या काही प्रमाणात निर्बंध देखील लादण्यात आलेले आहेत, मात्र दररोज आढळणारी रूग्ण संख्या ही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. या संदर्भात आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “ आम्ही अगोदर देखील म्हणालो आहोत, लॉकडाउन… लॉकडाउन… असं जरी कोणी म्हणत असेल तरी तो आत्ता लावला जाणार नाहीच. सध्या अजिबात तो विषय नाही. कारण, काल मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ अशा आरोग्य विभाग व टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत लॉकडाउनची कुठेही चर्चा झालेली नाही. निर्बंध वाढविले पाहिजे आणि लॉकडाउनची भाषा आम्ही त्याचवेळी केली की, ज्यावेळी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाउन होऊन जाईल. अशा पद्धतीने ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाउनचा काही विषय नाही.