ऑनलाईन टीम / नागपूर :
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करुनही तेथील प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. तेथील एका विशिष्ट लोकसंख्येचा भाग आजही स्वातंत्र्याच्या गोष्टी करतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
नागपुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, काश्मीरला अलीकडेच भेट दिली. कलम 370 रद्द करण्यापूर्वी जम्मू काश्मीरसाठी दिला जाणारा 80 टक्के निधी राजकारण्यांच्या खिशात जात होता. त्यामुळे तेथील विकास खुंटला होता. आता ती परिस्थिती राहिली नाही. कलम 370 रद्द झाल्यामुळे तेथील विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचं निदर्शनास आले. तेथील लोक आनंदाने जीवन जगत आहेत. मुलांच्या हाती पुस्तकाऐवजी दगड देणाऱया लोकांनी आता दहशतवाद्यांचे कौतुक बंद केले आहे. मात्र, कलम 370 रद्द करुनही तेथील प्रश्न पुर्णपणे सुटलेला नाही. त्या ठिकाणी एका विशिष्ट लोकसंख्येचा भाग अजूनही स्वातंत्र्याची भाषा करत असल्याचेही भागवत यांनी सांगितले.