ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपालांनी वापरलेली भाषा ही योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच आत्मसन्मान असणारी व्यक्ती यानंतर त्या पदावर राहणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला.
राज्यपालांनी मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आज शरद पवार उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्यपालांवर तोफ डागली.
ते म्हणाले, 1957 सालापासून चे सर्व राज्यपाल मी पाहिलेत. त्यानंतर 1967 पासूनच्या सर्व राज्यपालांशी माझा थेट संबंध आला पण कोणी असे वक्तव्य आतापर्यंत कोणी केलेले मी पाहिले नाही. तसेच स्वतः केंद्रीय गृमंत्र्यांनीच कानउघाडणी केल्यानंतर या पदावर राहयचे की नाही हा विचार करावा, असेही पवार यांनी राज्यपालांचे नाव न घेता म्हटले आहे.
- खडसेंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न
दरम्यान, एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, एकनाथ खडसे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते होते, अर्थमंत्री होते. त्यांचे कर्तृत्व, काम मोठे आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. राजकीय निर्णय काय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, असे शरद पवार म्हणाले.
भाजपाकडून नोंद घेतली जात नाही असे खडसेंना वाटत असेल, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची त्यांची भूमिका त्यांची असू शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पक्ष सोडलेल्यांना परत घेण्याबाबत शरद पवारांनी गेलेत तिथे सुखी रहा असा संदेश दिला.