ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच यंदा देखील दहीहंडी उत्सवासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरुन सध्या राजकारण मोठय़ा प्रमाणात तापले आहे. त्याच आता भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. दहीहंडी उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना ‘महाराष्ट्र सरकारने नियम आखून परवानगी दिली तर स्वागत आणि नाही दिली तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणाच, असा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी सरकारला दिला आह. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, महाराष्ट्र सरकार ने नियम आखून परवानगी दिली स्वागत… अन नाही दिली तरी आम्ही श्री कृष्ण जन्माचा सोहळा # दहीहंडी करणारच. हिंदू धर्माचे सण आम्ही साजरे करणारच. स्वतः घरात बसुन हिंदूनी काय करावे अन करू नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, असा टोला राम कदम यांनी सरकारला लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी उत्सावाच्या आयोजनाची परवानगी नाकारली. त्यानंतर राम कदम यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका करत आयोजक नात्याने घाटकोपर येथील दहीहंडी उत्सव साजरा करणार. सरकारने कितीही फतवा काढला कितीही रोखले तरीही दहीहंडी उत्सव साजरा होणार,असा इशारा दिला होता.