ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ च्या अंमलबजावणीबाबत शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित केले. यावेळी मोदी यांनी अर्थसंकल्पाची माहिती दिली. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा शैक्षणिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तरुण पिढीचे भारताचे भविष्य असे वर्णन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारताच्या भावी नेत्यांना सक्षम करण्याचे आवाहन केले. आपली आजची तरुण पिढी ही देशाच्या भविष्याचे कर्णधार आहेत, ते भविष्याचे निर्माते आहेत. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला सक्षम बनवणे म्हणजे भारताचे भविष्य मजबूत करणे होय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ च्या शैक्षणिक क्षेत्रावरील सकारात्मक प्रभावावर भर देताना सांगितले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान २०२२ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी संबंधित पाच गोष्टींवर जास्त भर देण्यात आल्याचे सांगितले. आपल्या शिक्षण पद्धतीचा विस्तार करून तिची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दुसरे म्हणजे कौशल्य विकास. देशात डिजिटल स्किलिंग इकोसिस्टम तयार झाली पाहिजे, उद्योगाच्या मागणीनुसार कौशल्य विकास व्हायला हवा, इंडस्ट्री लिंकेज अधिक चांगले असावे, याकडे लक्ष देण्यात आले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.