संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन
wपणजी प्रतिनिधी
राज्यातील तरुणांनी सैन्यात भरती व्हावे, जेणेकरुन गोव्याचा नावलौकिक आणखी वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. ते काल मंगळवारी 72 व्या सैन्यदिनानिमित्त कांपाल येथे आयोजित लष्कराच्या कार्यक्रमात बोलत होते. गोमंतकीय युवकांना सैन्यभरतीची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, ब्रिगेडिअर संजय रावल आणि ऍडमिरल फिलीपोज मॅथ्यू यांची उपस्थिती होती.
दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण श्रीपाद नाईक यांनी काढली. सर्जिकल स्ट्राईकच्या रुपाने सैन्याने आपली ताकद जगाला दाखवून दिली. भारतीय सेना जगात सर्वोत्तम आहे. केवळ युद्धजन्य परिस्थितीतच नाही तर नैसर्गिक आपत्तीमध्येही सैन्यदल बचाव आणि मदतकार्यासाठी अग्रेसर असते. देशातल्या 35 जिह्यांमध्ये यावषी पुराने थैमान घातले होते, सैन्यदलाने 45,000 नागरिकांचे प्राण वाचवले. सैन्याच्या कामगिरीने नेहमीच देशाचा गौरव वाढवला आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील तरुणांना लष्कराविषयी माहिती मिळावी, प्रेरणा मिळावी या उद्देशाने भारतीय सैन्याने या मेळाव्याचे आयोजन केले होते. अतिशय नेटके संचलन, शिस्तबद्ध कवायती, मधुर बँड, हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके यामुळे उपस्थित भारावून गेले होते.