वादात मध्यस्थी करणार्या तरुणावर कोयत्याने वार
प्रतिनिधी / कोल्हापूर
दारात कचरा टाकण्याच्या किरकोळ वादात मध्यस्थी करणार्या तरुणाचा तीघांनी कोयत्याने मानेवर सपासप वार करुन खून केला. बुधवारी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे ही घटना घडली. आकाश आनंदराव वांजोळे (वय 28 रा. वासुदेवनगर क्रांतीसिंह नाना पाटील नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी करवीर पोलीसांनी भरत दिलीप कचरे (वय 32), मारुती दिलीप कचरे (वय 39), सुरेश दिलीप कचरे (वय 29) या तीघांना अटक केली. याबाबतची फिर्याद दत्तात्रय तम्मा फोंडे (वय 30 रा. वासुदेव नगर, फुलेवाडी रिंग रोड) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश वांजोळे अविवाहीत असून आई, वडील, बहीणीसोबत वासुदेवनगर येथे राहतो. तो सिव्हील कॉन्ट्रक्टर असून बांधकामावर सुपर वायझरचे काम करतो. याच परिसरात सुभाष फोंडे, दत्ता फोंडे आपल्या परिवारासह राहतात. आकाश वांजोळे व सुभाष फोंडे हे मित्र आहेत. फोंडे यांच्या शेजारी मारुती कचरे, भरत कचरे, सुरेश कचरे राहतात. फोंडे व कचरे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दारातील गटारीमध्ये कचरा टाकण्याच्या कारणावरुन वाद धुमसत आहे. शनिवार 2 जानेवारी रोजीही या दोन कुटूंबामध्ये जोरदार वाद झाला होता. हा करवीर पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता. यावेळी पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन दोनही कुटूंबाना समज दिली होती. दरम्यान बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या दोन कुटूंबामध्ये जोरदार वाद झाला. भरत कचरे, मारुती कचरे, सुरेश कचरे यांच्यासह सुभाष फोंडे, दत्ता फोंडे यांच्यामध्ये झटापट झाली. घरातील महिलांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान सुभाष फोंडे याने या घटनेची माहिती जवळच राहणार्या आकाश वांजोळे यास फोनकरुन दिली. आकाश वांजोळे दुचाकीवरुन घटनास्थळावर दाखल झाला. त्याने सुभाष फोंडे यांची बाजू घेत भरत कचरे, मारुती कचरे यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या तीघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. या वादातून चिडून सुरेश कचरे याने घरात जावून घरातील धारदार कोयता आणला. या कोयत्याने त्याने आकाश वांजोळेच्या मानेवर डाव्या बाजूस वार केला. हा वार वर्मी लागल्याने आकाशच्या मानेतून जोरदार रक्तस्त्राव सुरु झाला. आकाश वांजोळे सुमारे 10 ते 15 फुट तडफडत गेला. तीन ठिकाणी पडला. तिसर्या ठिकाणी तो बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळयात पडला होता. घटनास्थळी जमलेल्या नागरीकांनी तात्काळ त्याला टेम्पोमधून उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सुरेशला अडविण्यासाठी गेलेला दत्तात्रय फोंडे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर सिपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान उपचारादरम्यान रात्री उशिरा 2 वाजण्याच्या सुमारास आकाश वांजोळे याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. करवीर पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मोलमजूरी करुन उदरनिर्वाह
कचरे व फोंडे परिवार मुळचे सोलापूर जिह्यातील असून उदरनिर्वाहासाठी कोल्हापूरात स्थायिक झाले आहेत. भरत, सुरेश व मारुती कचरे हे टेम्पोचालक असून लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसरात हमाली करुन आपला उदरनिर्वाह करतात.
वेळीच दखल घेतली असती तर..
कचरे व फोंडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद धुमसत होता. शनिवार (2 जानेवारी) रोजी या दोनही कुटूंबामध्ये जोरदार वाद झाला होता. यावेळी करवीर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र याचवेळी जर पोलीसांनी कडक भूमिका घेतली असती, तर आज दोन कुटूंब उद्धस्त होण्यापासून वाचली असती. आकाश हा एकुलता एक मुलगा होता. तर कचरे कुटूंबातील तीनही कर्ते पुरुष या गुन्ह्यामध्ये अडकले.
कोयता जप्त
भरत कचरे, सुरेश कचरे, मारुती कचरे हे तीघेही स्वतःहून करवीर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी स्वतःहून गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांच्या स्वाधिन केला.