मोरजी/प्रतिनिधी
वजरी येथील लाईनमच्या मृत्युच्या विषयावर राजकीय पोळी भाजण्याचा अश्लाघ्य प्रकार मगोचे नेते सुदीन ढवळीकर व गोवा फा?रवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना केला आहे. एका मृत्यू प्रकरणाचा राजकीय वापर करण्याचा हा प्रयत्न निंदनीय व निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया चांदेल हसापूरचे सरपंच संतोष मळीक यांनी व्यक्त केली आहे. .
या तरुण लाईनमनने केलेली आत्महत्या ही दुःखद घटना आहे. त्याच्या कुटुंबियांवर नियतीने मोठा आघात केला आहे. अशा प्रसंगी कुटुंबियांचे सांत्वन न करता, त्यांना धीर न देता या प्रकरणी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर तथ्यहीन आरोप व वक्तव्ये करून या नेत्यांकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे मळीक यांनी म्हटले आहे.
‘पेडणे मतदारसंघातील या तरुणाच्या मृत्यूची घटना दुःखद आहे. ढवळीकर व सरदेसाई यांनी या मृत्यूप्रकरणात आजगावकर यांच्यावर केले?ले दोषारोप तथ्यहीन आहेत. हकीगत जाणून न घेताच हे नेते दोषारोप करत सुटले आहेत. त्यांनी आधी वस्तुस्थिती जाणून घ्यावी. राजकीय दुश्मनीत एकमेकांवर इतर विषयांवर दोषारोप करणे सामान्य असते. पण, एका तरुणाचे अकाली निधन हा संवेदनशील विषय आहे. यात राजकारणाचे घाणेरडे खेळ खेळू नये‘, असे मत मळीक यांनी व्यक्त केले.
या तरुण लाईनमनच्या बदलीशी आपला काहीही संबंध नाही, हे आजगावकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे, असेही मळीक यांनी सांगितले.