प्रतिनिधी/ निपाणी
‘तरुण भारत’ने निर्भिड पत्रकारिता करताना सामाजिक बांधिलकीही जोपासली. यंदाच्या दिवाळी सणावर कोरोनाचे सावट आहे. अशावेळी ‘तरुण भारत’ने सकारात्मक वृत्ती वाढीस लागावी अशा प्रकारचा दिवाळी अंक देत वाचकांना तृप्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. महिला, युवकांची गरज लक्षात घेऊन ‘तरुण भारत’ने उपयुक्त लेख देत गुणवत्तेलाही न्याय दिला आहे, असे प्रतिपादन निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी केले.
लक्षवेधी अशा ‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन निपाणी कार्यालयात उत्साहात झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी आवृत्तीप्रमुख परशराम शिसोदे यांनी ‘तरुण भारत’च्या वाटचालीचा आढावा घेतला. यानंतर गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, देवचंद महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांनी, 1980 पासून आपण ‘तरुण भारत’चे वाचक आहोत. शैक्षणिक कारकिर्दीत सेट, नेट व पीएच.डी. साठी ‘तरुण भारत’चे अंक उपयोगी पडले. सध्या कोरोनाच्या काळात जग एका वेगळय़ा उंबरठय़ावर आले असताना ‘तरुण भारत’ने दिवाळी अंकातून सकारात्मक विचार देत मानसिक बळ देण्याचे काम केले आहे. केवळ एक अंक म्हणून नव्हे तर संदर्भ ग्रंथ म्हणून जतन करावा, अशी दिवाळी अंकाची सुंदर निर्मिती झाली आहे.
साहित्य, संस्कृती, नृत्य, शिल्प यांचा संगम या अंकात दिसून येतो. राजेश खन्ना यांच्यावरील लेख तसेच विद्या बाळ व हमीद दलवाईंसारख्या चळवळीतील नेत्यांचे लेख आयुष्याकडे सकारात्मकतेने कसे पहावे हे दाखवून देतात. हा अंक वाचकांना नक्कीच पसंत पडेल यात शंका नाही.
यावेळी उपसंपादक भानुदास कोंडेकर, महादेव बन्ने, शहर प्रतिनिधी अमर गुरव, जाहिरात प्रतिनिधी उत्तम सूर्यवंशी, वसुली अधिकारी सिकंदर माळकरी, सुनील वारके, आर. एस. भाईनाईक, डी. आय. जाधव, शकील शेखबडे, आदीनाथ कुंभार, आकाश पोवार आदी उपस्थित होते. महेश शिंपुकडे यांनी आभार मानले.