सातारा / प्रतिनिधी :
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ‘तरुण भारत’च्या वर्धापनदिन सोहळ्याचा जल्लोष नव्हता. मात्र, असंख्य वाचकांनी, जाहिरातदारांनी दिलेल्या शुभेच्छांच्या, प्रेमाच्या बळावर एका छोटेखानी समारंभात कोरोनानंतरचे जग या प्रसिध्द केलेल्या पुरवणीचे प्रकाशन प्रमुख पाहुणे राज्याचे कोव्हिड 19 नियंत्रण सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रारंभी तरुण भारत चे संस्थापक स्व. बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या छोटेखानी समारंभात आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी ‘तरुण भारत’च्या 100 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच सातारा आवृत्ती रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ‘तरुण भारत’चे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान चिरंतन स्मरणात राहणारे असल्याचे सांगून, तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांनी मराठी भाषिकांची अस्मिता जागृती ठेवून मराठी माणसांसाठी सुरु ठेवलेला सनदशीर लढा गौरवास्पद असल्याचे सांगितले. तरुण भारतच्या सातारा आवृत्तीने देखील जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
डॉ. दीपक म्हैसेकर यांनी देखील तरुण भारतच्या वाटचालीचा गौरव करताना सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी जपणारे हे दैनिक असल्याचे सांगितले. एक वाचनीय परंपरा जपणारे, दर्जेदार दैनिक तसेच मराठी भाषिकांच्या लढय़ात तन, मन, धनाने योगदान देणारी ही संस्था असून, यामध्ये संपादक किरण ठाकूर यांचे योगदान अतिशय कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त तरुण भारतच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी तरुण भारतचे जाहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, मुख्य वितरण विभाग व्यवस्थापक अभिजित ब्रम्हदंडे, उपसंपादक चंद्रकांत देवरुखकर, ऑफिस सुप्रिटेंड सागर कोठावळे, प्रतिनिधी विशाल कदम, वितरण विभागाचे मंदार कोल्हटकर तसेच संपादकीय, वितरण, जाहिरात विभागातील सर्व सेवकवृंद उपस्थित होते.