प्राचार्य शशांक मक्तेदार यांचे गौरवोद्गार : ‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
प्रतिनिधी / पणजी
खकोणतेही लिखाण हे लयशिवाय होऊ शकत नाही. याशिवाय जी काही बांधणी असते ती भरकटू न देण्याचे काम लय करत असते. ज्याप्रकारे संगीतामध्ये लय असते त्याप्रमाणे साहित्यातही लय असते. लयबद्धतेशिवाय कुठलीही साहित्यकृती तयार होत नाही. हीच लयबद्धता ‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकात दिसून येते आणि यातच तरुण भारतचे यश आहे. हा दिवाळी अंक कुणालाच खाली ठेवावासा वाटणार नाही, असे प्रतिपादन गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य शशांक मक्तेदार यांनी पणजी तरुण भारत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
यावेळी गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, सहाय्यक संपादक विजय पाटील,जनसंपर्क अधिकारी मंगेश काळे, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक रवींद्र पाटील, वितरण विभागाचे व्यवस्थापक शंकर जाधव, लेखा विभागातील आत्माराम नाईक, मार्केटिंग विभागाचे अनिल कालेकर, शेखर शेटय़े, सोशल मीडियाचे पत्रकार दत्तराज नाईक, पत्रकार जय नाईक, जाहिरात विभागाचे परशराम बेळगावकर, पत्रकार शैलेश तिवरेकर, प्रज्ञा मणेरीकर, रिमा केसरकर, छाया पत्रकार उमेश बाणस्तारकर उपस्थित होते. दरम्यान, प्रा. शशांक मक्तेदार यांच्याहस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
तरूण भारत हा मोठा परिवार
तरुण भारत हे नाव मी लहानपणापासून ऐकतोय. तरुण भारत हा मोठा परिवार आहे. ‘साथी हाथ बढाना’ हे वाक्य तरुण भारत दिवाळी अंक तयार करण्याच्या प्रक्रियेत लागू होते. प्रत्येक घटकाचा हात या दिवाळी अंकाला लागला आहे. घरी जेव्हा दिवाळी अंक यायचा तेव्हा तो पहिल्यांदा कोण वाचेल यासाठी भांडणे होत असे. मागील 35 वर्षांपासून मी स्वरलयीचा उपासक आहे. गाणे आणि वाचन हे फक्त मला संस्कारात मिळाले आहे. संगीतामध्ये साहित्य आहे तसेच साहित्यामध्येही संगीत आहे. कोणतेही लेखन जेव्हा वाचले जाते तेव्हा मनामध्ये एक तरंग तयार होतात तेव्हा स्वरांची निर्मिती होते. लयबद्धतेशिवाय कुठलीच साहित्यकृती होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये लय, स्वर आहेत असे मत शशांक मक्तेदार यांनी व्यक्त केले.
दिवाळी अंकाला गोव्यात जास्त पसंती
सध्या आपण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग शोधत आहोत आणि हाच मार्ग आपल्याला दिवाळी अंकातून सापडत आहे. माणसाची भूक ही विविध प्रकारची असते. त्यातीलच एक म्हणजे संगीताची भूक. यापूर्वी तीन संगीततज्ञांच्याहस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेले शशांक मक्तेदार यावेळी उपस्थित आहेत. एका दिवाळी अंकाला सुमारे 800 जणांचा हात लागले आहेत. दिवाळीचा फराळ कितीही खाल्ला तरी दिवाळी अंक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला जात नाही. गोवा हे दिवाळी अंक जास्त खपण्याचे केंद्र आहे. दिवाळी परिपूर्ण ही दिवाळी अंक आल्यावरच होते, असे प्रतिपादन गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांनी यावेळी केले.
यावेळी संपादक सागर जावडेकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, समई व भेट देऊन प्रा. शशांक मक्तेदार यांचा सत्कार करण्यात आला.
तरुण भारत दिवाळी अंकाची मोठी परंपरा
तरुण भारत दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. दिवाळी आली की तरुण भारतचा दिवाळी अंक आतुरतेने वाट पाहतात. दिवाळी अंकांची प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते. उत्तम कवी, कवयित्री, लेखक संपादकीय विभागातून निवडले जातात. यंदाच्या दिवाळी अंकांचे संपादन बालमुकुंद पत्की यांनी केले आहे. दिवाळी अंकात 40 कवी कवियत्रींच्या कविता आहेत. आशयपूर्ण, वैचारिक असे लेख आहेत. कथा, व्यंगचित्रे, विनोदी कथा, ही मॅन धमेंद्र यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाचा प्रकाशझोत टाकला आहे. संपादनासाठी सुमारे 1 ते 2 महिने लागतात. याशिवाय आठही आवृत्तीतील प्रतिनिधी, जाहिरात व्यवस्थापकांनी यात हातभार लावला आहे. छपाई विभागाचे काम सुमारे 15 दिवस चालते. त्यानंतर बाईंडिंगचे काम 8-10 दिवस. हा दिवाळी अंक बनविण्यासाठी अनेकांचे हात लागले आहेत. सीमाभागातील दर्जेदार लेखकांना घडविण्याचे काम तरुण भारतने केले आहे. दर्जेदार लेखकांना तरुण भारतने घडविले आहे. या लेखकांना दिवाळी अंकातही लिखाणासाठी संधी दिली आहे. सर्वांच्या सहकार्याने हा दिवाळी अंक घडला असल्याचे सहाय्यक संपादक विजय पाटील यांनी यावेळी सांगितले.