37 व्या वर्धापन दिनी डॉ.संजय देशमुख यांचे प्रतिपादन : ‘कोरोनानंतरचे जग’ विशेषांकाचे प्रकाशन
प्रतिनिधी / सावंतवाडी
‘तरुण भारत’चे संस्थापक बाबुराव ठाकुर, सल्लागार संपादक किरण ठाकुर व कुटुंबियांनी वृत्तपत्र क्षेत्रातून शिक्षण व समाजप्रबोधनाची रोवलेली मुहुर्तमेढ व परंपरा आजही समर्थपणे जोपासण्याचे काम ‘तरुण भारत’ परिवार करत आहे. आपण कुलगुरुपदाच्या काळात तसेच अभ्यास, संशोधनासाठी सिंधुदुर्गात राहिलो आहे. त्यावेळी ‘तरुण भारत’चे काम अगदी जवळून पाहिले. वृत्तपत्र म्हणून जबाबदारी व बांधिलकी जोपासत जनाधार मिळविण्याचे काम ‘तरुण भारत’ने केले, असे गौरवोद्गार मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी काढले.
‘तरुण भारत’च्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी येथे आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत ‘तरुण भारत’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीधर शंकर, सीएमओ उदय खाडीलकर, सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख शेखर सामंत, सोशल मीडिया प्रमुख प्रसाद सु. प्रभू, लोकमान्यचे विभागीय व्यवस्थापक आनंद सामंत, ‘तरुण भारत’चे जाहिरात व्यवस्थापक श्याम पंडित, वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर, डेस्क इन्चार्ज अवधूत पोईपकर, व्यवस्थापन विभाग
प्रमुख संतोष खानोलकर यांच्यासह तालुका प्रतिनिधी, वार्ताहर उपस्थित होते. यावेळी वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘कोरोनानंतरचे जग’ या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
काळाप्रमाणे बदल घडविले!
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, वृत्तपत्राने शिक्षण प्रसार व समाज
प्रबोधनाचे काम केले पाहिजे. कोरोना काळानंतर युवकांना दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य वृत्तपत्रांकडे आहे. ‘तरुण भारत’ने आजपर्यंत अखंड व अविरतपणे हे कार्य केले. तसेच यापुढेही करावे. ‘तरुण भारत’ केवळ छापील बातम्या देत नाही. तर
काळाप्रमाणे त्यांनी आपल्यात बदल करत प्रत्येक मिनिटांची खबरबात आधुनिक तंत्रज्ञानाने देत आहेत. ही प्रगती कौतुकास्पद आहे.
पत्रकार कोरोना योद्धाच!
वर्धापन दिन विशेषांकाचे कौतुक करतानाच ‘कोरोनानंतरचे जग’ ‘पॉझिटिव्ह’ दाखविण्याच्या संकल्पनेचे कौतुक करत जनतेला आवश्यक माहिती दिल्याबद्दल डॉ. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना काळात कोणीही कितीही काम केले तरी पत्रकारांनी केलेले कार्य कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यासारखे असल्याचे सांगत आपत्ती काळातील पत्रकारांच्या कामगिरीचे कौतुक केले.
ही तर चळवळ!
सीएमओ खाडीलकर म्हणाले, ‘तरुण भारत’ हे केवळ वृत्तपत्र नाही तर ती एक चळवळ आहे. वृत्तपत्राचे अन्यायाविरुद्ध झुंज व समाजप्रबोधन हे जे ब्रीद आहे ते जपत वाचकांशी एक आपुलकीचे नाते ‘तरुण भारत’ने निर्माण केले. ते यापुढेही जोमाने सुरू राहील. यावेळी मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीधर शंकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांनी ‘तरुण भारत’ची सामाजिक बांधिलकी विषद करत गेल्या 37 वर्षातील अक्षरसेवेचा उलगडा केला. शिवाय वाचकांची निष्ठा जपण्याचे काम ‘तरुण भारत’ यापुढेही करेल, अशी ग्वाही दिली. शिवाय 100 वर्षांची परपंरा जपणाऱया दैनिकात प्रत्येक कर्मचाऱयाला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळणाऱया ठाकुर कुटुंबियांचे आभार व्यक्त केले.
यावेळी डॉ. देशमुख यांचा आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक राजेश मोंडकर यांनी केले. तर आभार प्रतिनिधी दत्तप्रसाद वालावलकर यांनी मानले. या कार्यक्रमाला तरुण भारत परिवारातील सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त जिल्हाभरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यालयाला भेट देत सदिच्छा दिल्या. आवृत्तीप्रमुख शेखर सामंत व टीमने शुभेच्छा स्वीकारल्या.