कोविड लसीकरणाचे महाराष्ट्राचे सल्लागार डॉ म्हैसेकर : ’तरुण भारत’ चा वर्धापनदिन उत्साहात
प्रतिनिधी/ सातारा
जागतिक महामारीच्या काळात ‘तरुण भारत’ने ज्या प्रकारे वाचक सेवा केली आहे ती देशाला आदर्श दाखवणारी आहे. ऐन लॉकडाऊन काळात सुद्धा सातारा जिह्यातील प्रत्येक व्यक्तीला ‘अचूक’ माहिती देणारा भीम पराक्रम ‘तरुण भारत’ने केला असून वाचक हिताची जपणूक करण्याचा हा आदर्श असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे कोविड लसीकरण टास्क फोर्सचे मुख्य सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
गेली 25 वर्षे सातारा जिल्हय़ाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार क्षेत्रातील अनेक घडामोडींचा साक्षीदार ठरलेला, असंख्य वाचकांच्या प्रेम पाठबळावर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेला, चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करुन त्या समाजात रुजवण्यासाठी अग्रेसिव्ह भूमिका घेणाऱया ‘तरुण भारत’ च्या सातारा आवृत्तीचा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवर, वाचकांच्या उपस्थितीविना साधेपणात साजरा झाला. मात्र, जाहिरातदार, हितचिंतकाच्या प्रेमपाठबळावर प्रकाशित करण्यात आलेल्या कोरोनानंतरचे जग या पुरवणीचे प्रकाशन कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते वर्धापनदिन सोहळा साधेपणाने साजरा झाला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ’तरुण भारत’ चा वर्धापनदिन सोहळय़ाचा जल्लोष नव्हता. मात्र, असंख्य वाचकांनी, जाहिरातदारांनी दिलेल्या शुभेच्छांच्या, प्रेमाच्या बळावर एका छोटेखानी समारंभात ’कोरोनानंतरचे जग’ या प्रसिध्द केलेल्या पुरवणीचे प्रकाशन या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते झाले.
यावेळी प्रारंभी ’तरुण भारत’ चे संस्थापक स्व. बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वल सोहळय़ानंतर या छोटेखानी समारंभात ‘तरुण भारत’चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी ‘तरुण भारत’ च्या 100 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच सातारा आवृत्ती रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याचे सांगितले.
यावेळी ‘तरुण भारत’चे जाहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, मुख्य वितरण विभाग व्यवस्थापक अभिजित ब्रम्हदंडे, कराड कार्यालयाचे प्रमुख देवदास मुळे, उपसंपादक चंद्रकांत देवरुखकर, लेखा विभागाचे सागर कोठावळे, प्रतिनिधी विशाल कदम, वितरण विभागाचे मंदार कोल्हटकर तसेच संपादकीय, वितरण, जाहिरात विभागातील सर्व सेवकवृंद उपस्थित होते.
सीमा लढय़ात ‘तरुण भारत’चे योगदान
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ‘तरुण भारत’चे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान चिरंतन स्मरणात राहणारे असल्याचे सांगून ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर यांनी मराठी भाषिकांची अस्मिता जागृती ठेवून मराठी माणसांसाठी सुरु ठेवलेला सनदशीर लढा गौरवास्पद असल्याचे सांगितले. ‘तरुण भारत’ च्या सातारा आवृत्तीने देखील जिल्हय़ाच्या सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सामाजिक बांधिलकी जपणारे दैनिक
डॉ. दीपक म्हैसेकर यांनी देखील ‘तरुण भारत’ च्या वाटचालीचा गौरव करताना सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी जपणारे हे दैनिक असल्याचे सांगितले. एक वाचनीय परंपरा जपणारे, दर्जेदार दैनिक तसेच मराठी भाषिकांच्या लढय़ात तन, मन, धनाने योगदान देणारी ही संस्था असून यामध्ये संपादक किरण ठाकूर यांचे योगदान अतिशय कौतुकास्पद असल्याची सांगून ‘तरुण भारत’च्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
’कोरोनानंतरचे जग’ वाचनीय पुरवणी
कोरोनाच्या आगमनानंतर सर्व जगाने जगण्याचा वेगळा अनुभव घेतला. या सर्व वाटचालीत सातारा जिल्हय़ात काम करताना तरुण भारत ने नेहमीची वेगळी खासियत जपली. भयंकर संकटात जिल्हावासियांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांना ’अचूक बातमी’ देण्याचे काम गेली 9 महिने सातत्याने सुरु ठेवले आहे. या कालावधीत प्रशासनासह आरोग्य, पोलीस विभागाच्या पाठीवर सातत्याने कौतुकाची थापही टाकली आहे. समाज, प्रशासन या समन्वय राखण्याचे काम करुन कोरोनाविरुध्द सुरु असलेल्या लढय़ात तरुण भारत सर्वांचा सखा, सोबती बनून राहिला होता. आता कोरोना संसर्ग कमी होवू लागला असून त्यानंतरचे जग कसे असेल हा विषय घेवून प्रकाशित केलेल्या पुरवणीतील मान्यवरांचे लेख दिशादर्शक ठरतील, असे गौरवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले.
वाचक, हितचिंतकांच्या अनुपस्थितीची रुखरुख
“तरुण भारत” हे असंख्य वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दैनिक. अतिरंजकता टाळून वास्तवाशी भिडत समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी, असंख्य मनांच्या मनातील अभिव्यक्तीचे हक्काचे माध्यम म्हणून तरुण भारत ची ओळख आहे. तरुण भारत चा वर्धापनदिन म्हणजे जिल्हय़ातील असंख्य मान्यवर, वाचकांसह अबालवृध्दांसाठी वेगळी पर्वणी असते. वर्षातील हा दिवस वाचकांच्या मांदियांळीने आनंदात न्हाऊन जातो. यावर्षी कोरोना स्थितीमुळे स्नेहमेळावा होवू शकला नाही. प्रशासनाचे नियम पाळलेच पाहिजेत, असा तरुण भारतचा आग्रह नेहमीच असतो. त्यामुळे वाचक, हितचिंतकांसह जाहिरादारांची अनुपस्थितीची रुखरुख सर्वांच्या मनात राहिली.