विद्यार्थी आत्महत्या प्रकरण सभागृहात
प्रतिनिधी / पणजी
सुकूर येथे एका विद्यार्थ्याने सरकारने माथी मारलेल्या ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेण्यासाठी स्मार्ट मोबाईल नसल्याने केलेल्या आत्महत्येच्या वृत्ताचे तीव्र पडसाद काल सोमवारी राज्य विधानसभेत उमटले. सदर वृत्त ‘तरुण भारत’ने प्रकाशित केले होते याकडे लक्ष वेधून फातोडर्य़ाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना उद्देशून एक निवेदन केले ते त्यांच्या जिव्हारी लागले.
विजय सरदेसाई म्हणाले की, हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरु मानित होते. गुरुपौर्णिमेदिनी पायाही पडले असतील, परंतु त्यांनी सुरू केलेली लॅपटॉप योजना आता का चालू ठेवली नाही? आता तरी गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयुक्त पडली असती. स्मार्ट फोन नसल्यामुळे शिक्षण मिळत नाही. या कारणामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ‘तरुण भारत’ने हे वृत्त प्रकाशित केले होते. या निवेदनाने प्रमोद सावंत यांचा पारा चढला व ‘तशी घटना घडलेलीच नाही ‘तरुण भारत’चे अनेकवेळा नाव घेऊन सदर वृत्त साफ खोटे आहे. ते खोटे बोलत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले व दुसऱया दिवशी ‘तरुण भारत’ने सरकारचा खुलासाही प्रसिद्ध केल्याचे ते म्हणाले.
तुम्ही आवाज चढविला म्हणून आपण घाबरत नाही, असे रोखठोक उत्तर विजय सरदेसाई यांनी दिले. लॉकडाऊनच्या काळात ऑन-लाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सोय करण्याऐवजी हे सरकार खाणीवर किती ट्रक भरून जात आहेत हे मोजण्यात गर्क, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांवर केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणखी संतापले व नको झालेले आरोप करू नका, असा सल्ला त्यांनी दिला.