दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची दखल, कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नेमणूकीसाठी हालचाली सुरू
वार्ताहर/पुलाची शिरोली
दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची दखल घेऊन पुलाची शिरोली येथील कार्यालयात कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नेमणूकीसाठी वीज वितरण कंपनीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. रविवारी दुपारी बापट कॅम्प कोल्हापूर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र महाद्वार यांनी अचानक शिरोली कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला.
रविवारी ‘शिरोलीतील ग्राहक वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे ञस्त ‘ अशा मथळ्याखाली दैनिक तरुण भारत वृत्तपत्र व सोशल मीडिया मध्ये बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेऊन वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिरोली कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला.
शिरोलीची सुमारे पन्नास हजार लोकसंख्या, जवळपास दहा हजार पर्यंत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची संख्या तर समारे सव्वा कोटी रुपये मासिक महसूल आहे. अशा शिरोली कार्यालयाचा कार्यभार गेल्या आठ महिन्यापासून गांधीनगर येथील वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अतुल सुतार यांच्याकडे आहे. ते तेथील कार्यालयातूनच शिरोलीचा कारभार चालवतात . परिणामी शिरोली कार्यातील कामगारांच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. याबाबत तरुण भारत मध्ये सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे शहर मुख्य अभियंता एन.आर. गांधले, सहाय्यक अभियंता कवाळे यांनी रविवारी तात्काळ हालचाली करून बापट कॅम्प येथील कार्यकारी अभियंता महाद्वार यांना भेट देण्यास सांगितले. महाद्वार यांनी दुपारी दिडच्या सुमारास शिरोली कार्यालयात येऊन कामाचा आढावा घेतला.
तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन चांगलीच कान उघाडणी केली. एकूणच शिरोली सारख्या मोठ्या महसुली गावात कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नाही. हे गावाचे दुर्दैव्य म्हणायचे कि ग्राहकांची चेष्टा म्हणायची. अशी म्हणण्याची वेळ शिरोलीकरांवर आली आहे. तरी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करून शिरोलीच्या ग्राहकांना तात्काळ व व चांगली सेवा देण्यासाठी विजवितरणने हालचाली सुरू केल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण शिरोली कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला .तसेच येथील ग्राहकांना तात्काळ व चांगली सेवा देण्याच्या आपण कामगारांना सूचना दिल्या आहेत. – रविंद्र महाद्वार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ,बापट कॅम्प
आपणाकडे गांधीनगर व पुलाची शिरोलीचा अतिरिक्त कार्यभार आहे . त्यामुळे येथील कामगारांच्यावर आपण विश्वास ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण त्यांच्याकडून अनागोंदी कारभार सुरू असल्याचे समजले. भविष्यात चुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. -अतुल सुतार, कनिष्ठ अभियंता, गांधीनगर