प्रतिनिधी / दापोली
पहिल्या लॉकडाऊन पासून दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात धावणारी लालपरी बंद झाली आहे. यात चक्रीवादळाचा कहर झाल्याने तालुक्यातील एसटी बस सेवा पूर्णपणे बंद झाली या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’ने घेतलेल्या विविध पातळ्यांवरील पाठपुराव्याला यश येऊन नूतन आगारप्रमुख प्रमोद धायतोंडे यांनी गुरुवारी दुपारी हर्णे मार्गावर दररोज पाच बस फेऱ्या सुरू करण्याचे व मुरुड, कर्दे, आंजर्ले मार्गांची पहाणीचे आदेश प्रशासनाला दिले.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दापोली तालुक्यात दळणवळणाचे मुख्य साधन असणारे असणारी 177 गावात जाणारी लालपरी थबकली. लालपरीच्या फेऱ्या बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणारे ग्रामस्थ गावातच लॉक झाले व शासनाचा एसटी बंद करण्याचा उद्देश सफल झाला. हळूहळू लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील एसटी सेवा सुरू करण्यावर भर देण्यात आला यानंतर चक्रीवादळ होण्याच्या आधी तालुका अंतर्गत बस सेवा चालू काम सुरू करण्याबाबत निर्णय जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवला होता
3 जून रोजी कोकणावर चक्रीवादळ आले व दापोली तालुक्यातील सर्व रस्त्यांवर वृक्ष कोसळून पडले यामुळे सर्व रस्ते ब्लॉक झाले हे रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाला आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागला मात्र तरीदेखील रस्त्यालगत पडलेले विजेचे खांब, डीपी व विजेच्या तारा यामुळे एसटी सुरू करण्यात अडचणी येत होत्या अनेक गावातील ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी श्रमदान करून रस्त्यावर पडलेले विजेचे खांब व तारा बाजूला केल्या तरीदेखील राज्य परिवहन मंडळाच्या दापोली आगाराकडून लालपरीला हिरवा झेंडा दाखवण्यात येत नव्हता.
यानंतर उदय सामंत यांच्या दापोली दौऱ्याच्या वेळी तरुण भारतने हा प्रश्न उपस्थित केला ग्रामीण भागात दळणवळणाचे मुख्य साधन लालपरी आहे चक्रीवादळ झाल्यानंतर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ग्रामस्थांना घराचे सामान आणण्यासाठी, जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी, घरावर टाकायला प्लास्टिक कापड, खिळे, चुका, अँगल, सिमेंट व किरकोळ गोष्टी आणण्यासाठी, औषध उपचाराकरिता दापोली यावे लागत आहे. लालपरी व वडाप बंद असल्यामुळे ग्रामस्थांना खाजगी गाडी करून दापोली शहरात यावे लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे दापोली आल्यावर देखील त्यांना हवी ती वस्तू मिळेल याची काही शाश्वती राहिलेली नाही त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा अधिक खर्च करून दापोलीत यावे लागत आहे. शिवाय चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी देखील ग्रामस्थांना शहरातील बँकांमध्ये यावे लागत होते. ही सर्व लालपरी बंद असल्यामुळे लोकांची होणारी अडचण लक्षात घेता तरुण भारतच्या सूचनेनुसार मंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला प्रत्येक महत्त्वाच्या मार्गावर सकाळी व संध्याकाळी दोन फेऱ्या सुरु करण्याचे आदेश दिले. मात्र आठवडा लोटला तरी दाभोळ व खेड मार्ग वगळता लालपणी धावत धावायला लागली नव्हती.
अखेर गुरुवारी दुपारी तरुण भारतच्या टीमने आगारप्रमुख प्रमोद धायतोंडे यांची भेट घेतली व ग्रामीण भागात बस सेवा का सुरू करण्यात आलेल्या नाहीत? याचा जाब विचारला. यावेळी गायतोंडे यांनी अनेक मार्गांवर तरी झाडे उचलण्यात आली असली तरी विजेच्या तारा व खांब पडलेले असल्याने एसटी सुरू झालेली नसल्याचे कारण सांगितले. मग हर्णे गावामध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झालेला असल्याने हर्णे पर्यंतच्या तारा व खांब उचलण्यात आलेले असल्याचे सिद्ध होते ही बाब तरुण भारतने धायतोंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. आगारप्रमुख धायतोंडे यांनी खात्री करून प्रशासनाला शुक्रवारपासून हर्णे मार्गावर 5 लालपरीच्या फेऱ्या सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच शुक्रवारी मुरुड व कर्दे या मार्गाचे निरीक्षण करून शनिवारपासून मुरुड व कर्दे मार्गावर देखील लालपरी सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र आंजर्ले पासून पुढिल भागात अद्याप विजेचे खांब व तारा पडलेल्या असल्याने तेथे एसटी सुरू करण्यास असमर्थता दर्शवली. मात्र हर्णे व कर्दे मार्गावर एसटी सुरू झाल्यानंतर आपण स्वतः एसटी घेऊन आंजर्ले मार्गावर जावू व ज्या गावापर्यंत एसटी जाणे शक्य आहे तेथपर्यंत किमान सकाळी व संध्याकाळी अशा मिळून दोन फेऱ्या सुरू करू असे आश्वासन प्रमोद धायतोंडे यांनी तरुण भारतशी मला दिले. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. नूतन आगार प्रमुख प्रमोद धायतोंडे यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल एसटी प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.