सांगली/प्रतिनिधी
वाचकांशी किंमतीपलीकडचे नाते जपणार्या आणि सीमा लढ्यातील अग्रेसर दैनिक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या तरुण भारतच्या सांगली आवृत्तीच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या ट्रेंड नवा ध्यास नवा या विषयावरील खास विशेषांकाचे शानदार प्रकाशन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते झाले. नेमिनाथ नगर येथील वाडीकर मंगल कार्यालयात शनिवारी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तरुण भारतचे संस्थापक स्वर्गीय बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी तरुण भारत बेळगावचे संपादक जयवंत मंत्री, सांगली चे संपादक मंगेश मंत्री, तरुण भारतचे सी.एम.ओ. उदय खाडिलकर, मुख्य वितरण व्यवस्थापक अभिजीत ब्रह्मदंडे, बेळगाव प्रिंटिंग युनिट इन्चार्ज धैर्यशील पाटील, जाहिरात व्यवस्थापक संजीव डाळिंबकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी तरुण भारतच्या देदीप्यमान कामगिरीचा गौरव केला. समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तरुण भारतची यशस्वीपणे वाटचाल सुरू असून जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये तरुण भारतचे नेहमीच योगदान राहिलेले आहे, असे ते म्हणाले. संपादक मंगेश मंत्री आणि उपस्थितांचे स्वागत तर आभार मुख्य प्रतिनिधी संजय गायकवाड यांनी मानले. मुख्य उपसंपादक अवधूत जोशी, व्यवस्थापक राहुल गोखले, वितरण व्यवस्थापक अनुप पुरोहित यांच्यासह तरुण भारत परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.